REVIEW : ‘बाटला हाऊस’चा थरार आणि जॉनची कमाल

| Updated on: Aug 15, 2019 | 10:33 PM

दिग्दर्शक निखिल आडवाणी आणि जॉन अब्राहमने या सिनेमात प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पटकावला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, सिनेमातील (Batla House Review) फ्रेम अन् फ्रेम भन्नाट झाली असून एक ज्वलंत विषय संवेदनशीलपणे हाताळण्यात आलाय.

REVIEW : बाटला हाऊसचा थरार आणि जॉनची कमाल
Follow us on

बॉलिवूडमध्ये सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवण्याचा ट्रेण्ड आलाय. अशा घटनांचा थरार मोठ्या पडद्यावर बघणं नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. 2008 मध्ये दिल्लीतील ‘बाटला हाऊस’मध्ये (Batla House Review) झालेल्या चकमकीवर आधारित हा सिनेमा आहे. कसलेली पटकथा, तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन हे या सिनेमाचं (Batla House Review) वैशिष्ट्य आहे. दिग्दर्शक निखिल आडवाणी आणि जॉन अब्राहमने या सिनेमात प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पटकावला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, सिनेमातील (Batla House Review) फ्रेम अन् फ्रेम भन्नाट झाली असून एक ज्वलंत विषय संवेदनशीलपणे हाताळण्यात आलाय.

या सिनेमाची कथा 13 सप्टेबर 2008 मध्ये सुरु होते. दिल्लीमध्ये झालेल्या सीरियल बॉमब्लास्टची केस दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडे सोपवण्यात येते. या स्पेशल सेलचे ऑफिसर केके (रवी किशन) आणि संजीव कुमार यादव(जॉन अब्राहम) आपल्या टीमसह बाटला हाऊस एल-18 इमारतीत पोहोचतात. तिथे पोलिसांची इंडियन मुजाहिद्दीनच्या संशयित अतिरेक्यांसोबत चकमक होते. या चकमकित दोन संशयितांचा मृत्यू होतो. तसेच पोलिस ऑफिसर केकेही या हल्ल्यात शहीद होतात. एक अतिरेकी मात्र यावेळी पळण्यात यशस्वी होतो. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय पक्ष, विविध संघटनांकडून संजीव आणि त्याच्या टीमवर महाविद्यालयातील निर्दोष मुलांची हत्या केल्याचे गंभीर आरोप केले जातात. या कठीण प्रसंगी संजीवला बाहेरच्या कमी आपल्या डिपार्टमेन्टमधील अंतर्गत राजकारणाचाच जास्त त्रास होतो. या सगळ्यामुळे व्यथित झालेल्या संजीव ‘पोस्ट ट्रॉमेटिक डिसॉर्डर’सारख्या मानसिक आजाराने त्रस्त होतो. या कठीण प्रसंगात न्यूज रिपोर्टर असलेली त्याची बायको नंदिता कुमार (मृणाल ठाकूर) त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आता हा सगळा चक्रव्यूह संजीवकुमार कसा भेदतो ? आपली आणि आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता तो कशी करतो ? त्याला कुठल्या खडतर मार्गावरुन प्रवास करावा लागतो ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘बाटला हाऊस’ बघावा लागेल.

एका दहशतवाद्याला मारण्यासाठी सरकार जी रक्कम देते, त्यापेक्षा जास्त एक ट्रॅफिक पोलीस आठवड्याभरात कमावू शकतो,’ असे अनेक पैसावसूल संवाद या चित्रपटात आहेत. आपले प्राण धोक्यात घालून देशासाठी काम करणाऱ्या पोलिसांची बाजूही या चित्रपटात खूपच चांगल्याप्रकारे दाखवण्यात आली आहे. प्रत्येक घटनेचे विविध पैलू मांडत या चित्रपटाची कथा पुढे सरकत राहते. याचे श्रेय दिग्दर्शक निखिल आडवाणीला जातं. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये पोलिसांचं धाडस, राजकारण, मानवाधिकार संघटनांचा आक्रोश, धार्मिक कट्टरता, प्रसारमाध्यम आणि तणाव या सर्व गोष्टी अधोरेखित करण्यात आल्यात. चित्रपटात दिग्विजय सिंह, अरविंद केजरीवाल, अमर सिंह आणि एल. के. आडवाणी यांसारख्या नेत्यांचे रिअल फुटेज वापरण्यात आलंय. सौमिक मुखर्जीची सिनेमाटोग्राफी उत्तम आहे.

चित्रपटाच्या शेवटी असलेला कोर्ट रुम ड्रामासुद्धा चांगला झाला आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाला पूर्णपणे रिएलिस्टीक ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पण बऱ्याच ठिकाणी याचा अतिरेक झालेला वाटतो. या सिनेमाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमात फक्त पोलिसांचं गुणगान गायलं नाही, किंवा त्यांची प्रतीमा खराब होईल असंही काही दाखवण्यात आलेलं नाही. जे सत्य आहेत तिच नेमकी बाजू दाखवण्यात निखिल दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरलाय. हा सिनेमा मध्ये थोडा संथ होतो. पण शेवटच्या काही मिनिटात सिनेमाची गाडी पुन्हा रुळावर येते. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमाचा शेवट अजून वेगळा करायला हवा होता.

पोलिस ऑफिसर संजीव कुमार यादवच्या भूमिकेत जॉन अब्राहमने भन्नाट काम केलंय. या भूमिकेसाठी छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास जॉनने केल्याचं ठळकपणे दिसतं. प्रत्येक सिनेमागणिक अभिनेता म्हणून जॉन प्रगल्भ होतोय. आपण कुठलीही भूमिका त्याच ताकदीने करु शकतो हे जॉनने पुन्हा एकदा सिद्ध केलंय. मृणाल ठाकूरनेही नंदिता कुमारच्या भूमिकेत आपली छाप सोडली. ती दिसलीही कमालीची सुंदर आहे. ऑफिसवर केकेच्या भूमिकेत रवी किशनला जास्त काम नसलं तरी छोट्या भूमिकेतही तो लक्षात राहतो. तुफैलच्या भूमिकेत आलोक पांडेने अप्रतिम काम केलंय. जॉनसोबत त्याची जुगलबंदी बघण्यासारखी आहे. नोरा फतेहीचा सिनेमात रोल छोटा असला तरी ‘साकी साकी’ गाण्यामुळे ती चांगलीच लक्षात राहते. त्या गाण्यात ती कमालीची बोल्ड दिसली. हे गाणं जबरदस्त हिट ठरलंय.

एकूणच काय तर निखिल आडवाणीच्या कसलेल्या दिग्दर्शनानं हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. जर तुम्हाला सत्यघटनेवर आधारित सिनेमांची आवड असेल तर बाटला हाऊसचा मन सुन्न करणारा हा थरारक अनुभव तुम्ही एकदा अनुभवाच. ‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला साडे तीन स्टार्स.