बीडः बीडचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेमार्गाच्या (Railway) प्रतीक्षेत आहे. नगर-बीड-परळी (Nagar-Parali Railway) रेल्वेचे काम आष्टीपर्यंत पूर्णही झाले आहे. आतापर्यंत या मार्गावर तीन वेळा रेल्वेची चाचणी झाली आहे. एवढंच नाही तर हायस्पीड (Highspeed train) चाचणीदेखील झाली आहे. त्यानंतर रेल्वे नियमित धावणार असल्याचं घोषित करण्यात आलं. मात्र रेल्वे काही धावली नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात नगर ते आष्टीदरम्यानची रेल्वे 07 मे रोजी धावणार असल्याची माहितीही दिली होती. मात्र या दिवसी रेल्वे धावलीच नसल्याने तालुक्यातील जनतेत पुन्हा निराशेचं वातावरण निर्माण झाल आहे.
मुंबईत भायखळा येथील एका कार्यक्रमात 29 एप्रिल रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी नगर आष्टी दरम्यान 61 किलोमीटर अंतरावरील रेल्वे मार्ग 07 मे रोजी सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. तसेच या मार्गावरील रेल्वे 07 मेपासून नियमित धावणार असल्याची माहितीदेखील दिली होती. मात्र याची अंमलबजावणी झालीच नाही.
नगर ते आष्टी दरम्यानची रेल्वे नियमित सुरु करणार असल्याच्या वावड्या आजवर अनेकदा उठल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांनी अधिकृत घोषणा करूनदेखील रेल्वे आलीच नसल्याने रेल्वे नेमकी धावणार कधी, याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी मात्र जेव्हा नियोजन कार्यक्रम हाती येईल, तेव्हाच कळवले जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे बीडकरांना पुन्हा एकदा रेल्वे विभागाच्या घोषणेची प्रतीक्षा लागली आहे.