सोनई हत्याकांड : चार आरोपींची फाशी हायकोर्टाकडून कायम, एकाची सुटका!

| Updated on: Dec 02, 2019 | 4:29 PM

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडप्रकरणी (Sonai murder case) मुंबई उच्च न्यायालयाने सहापैकी 4 आरोपींची फाशी कायम ठेवली आहे.

सोनई हत्याकांड : चार आरोपींची फाशी हायकोर्टाकडून कायम, एकाची सुटका!
mumbai high court
Follow us on

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडप्रकरणी (Sonai murder case) मुंबई उच्च न्यायालयाने सहापैकी 4 आरोपींची फाशी कायम ठेवली आहे. अहमदनगरमधील सोनई (Sonai murder case) गावात 2013 मध्ये तिघांची हत्या केल्याप्रकरणी, सहापैकी चार आरोपींना फाशी , तर एका आरोपीची पुराव्याअभावी सुटका करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

गेल्यावर्षी जानेवारी 2018 मध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं सोनई हत्याकांडप्रकरणी सहा आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. दरम्यानच्या काळात एका आरोपीचा कोठडीतच मृत्यू झाला. परिणामी 5 आरोपींच्या फाशीच्या पुढील कारवाईसाठी सरकारकडून उच्च न्यायालयात कार्यवाही सुरु होती.  आज कोर्टाने उर्वरीत 5 दोषींपैकी चौघांची फाशी कायम ठेवली.

फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोषींमध्ये रमेश दरवळे, प्रवीण दरवळे, प्रकाश दरवळे, संदीप कुरे यांचा समावेश आहे. तर अशोक नवगरे याची पुराव्याअभावी सुटका झाली आहे.

काय आहे प्रकरण?

नगर जिल्ह्यातील सोनई इथं 1 जानेवारी 2013 रोजी प्रेमप्रकरणातून तिघांचं हत्याकांड झालं होतं. ऑनर किलिंगच्या या प्रकाराने संपूर्ण राज्य हादरलं होतं. नाशिक सत्र न्यायालयाने या हत्याकांडाचा निकाल देताना, जातीवाद आणि त्यातून होणाऱ्या अशा घटना म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे असं म्हटलं होतं.

या आरोपींना दया दाखवणं म्हणजे शहरी वस्तीत लांडगे सोडण्यासारखं आहे, असं न्यायालयानं म्हटलं होतं. हा प्रकार दुर्मिळातील दुर्मिळ आणि ऑनर किलिंगचा असल्याचं सांगत नाशिक सत्र न्यायालयानं या आरोपींना गेल्या वर्षी फाशीची शिक्षा सुनावली होती.