दुष्काळासाठी केंद्राकडून आणखी 2160 कोटी, आतापर्यंत 4248 कोटींची मदत

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ आणि केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. या मदतीमुळे राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मोठ्या प्रमाणात वेग येण्याची अपेक्षा आहे. चारा छावण्यांमध्ये साडे […]

दुष्काळासाठी केंद्राकडून आणखी 2160 कोटी, आतापर्यंत 4248 कोटींची मदत
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ आणि केंद्र सरकारकडून आणखी 2160 कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत 4248.59 कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. या मदतीमुळे राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मोठ्या प्रमाणात वेग येण्याची अपेक्षा आहे.

चारा छावण्यांमध्ये साडे आठ लाख जनावरे

मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशूधन दाखल झाले आहेत. चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे चारा छावण्या हाच एकमेव पर्याय सध्या शेतकऱ्यांसमोर उरला आहे.

पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने आणि स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये पशूधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ॲप विकसित करण्यात आलंय. त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

जनावरांच्या आहारामध्ये वाढ

पशुधनाच्या आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठ्या जनावरांना यापूर्वी 15 किलोग्रॅम हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस दिला जात होता. आता मोठ्या जनावरांना दैनंदिन 18 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना यापूर्वी 7.5 किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होता. आता त्यात वाढ करुन 9 किलो दैनंदिन चारा दिला जाईल.

या छावण्यांमध्ये 8 लाख 55 हजार 513 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आलंय.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 35 कोटी निधी उपलब्ध झालाय. चाऱ्यासाठी 25 हजार 99 क्विंटल बियाण्यांचे वितरण झालं आहे. गाळ पेरा क्षेत्रात 17 हजार 465.64 हेक्टर तर शेतकऱ्यांच्या शेतात 41 हजार 355.68 हेक्टर अशी एकूण 58 हजार 821.32 हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची पेरणी झाली आहे. यामधून 29.4 लक्ष मेट्रिक टन हिरवी वैरण उत्पादन अपेक्षित असल्याचं राज्य सरकारने म्हटलंय.