आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती

| Updated on: Jun 23, 2021 | 7:16 PM

राज्यात खरिप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहीम राबवली जात आहे. Krishi Sanjivani Movement

आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, राज्यभर कृषी संजीवनी मोहीम सुरु, दादाजी भुसेंची माहिती
दादाजी भुसे, कृषी मंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात खरिप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजीवनी मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 1 जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. (Dadaji Bhuse said Krishi Sanjivani Movement will help to reach modern technology to farmers)

यंदा कृषी संजिवनी मोहीम 1 जुलैपूर्वी

दरवर्षी 1 जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तो पर्यंत खरिप पिकांचा पेरणी आणि जमीन मशामगतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलैपूर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन

21 जून पासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्या 24 जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बीया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

1 जुलै कृषी दिनी समारोप

25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, 29 जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, 30 जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. 1 जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे.

गावोगावी जाऊन मार्गदर्शन

मोहिमेमध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याबाबत कृषी संचालक विकास पाटील यांनी सूचना केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

तरुण शेतकऱ्याला मारहाण, कांद्याचे भाव पाडले, व्यापाऱ्यावर कारवाईसाठी शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन

बुलडाण्यात पुरेशा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

(Dadaji Bhuse said Krishi Sanjivani Movement will help to reach modern technology to farmers)