पुणे : राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे करोडोंची वित्तहानी झाली आहे तर रोगराईमध्येही वाढ झाली आहे. पाऊस लांबल्याने डेंग्यू आणि चिकनगुनिया (Dengue and Chikungunya patient) या साथीच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. डेंग्यूने आतापर्यंत चार रुग्ण दगावले असून पंधरा ते वीस जणांचा संशयित मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेतही यंदा रुग्णांच्या संख्येत (Dengue and Chikungunya patient) वाढ झाली आहे.
राज्यात तब्बल सहा हजार 390 डेंग्यूचे रुग्ण आहेत. यामध्ये चौघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तर 15 रुग्णांचा संशयित मृत्यू आहे. 1 जानेवारी ते 9 सप्टेंबर 2019 या 9 महिन्याच्या दरम्यान रुग्णांच्याही संख्येत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत हीच संख्या पाच हजार 914 होती. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत 476 रुग्णांत वाढ झाली आहे. डेंग्यू सारखीच चिकनगुनियाची अवस्था आहे. चिकनगुनियाचे सप्टेंबरपर्यंत 703 रुग्ण आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 102 रुग्ण जास्त आहेत.
सतत पडणाऱ्या पावसाने सर्वत्र ओलसर भाग आहे. उथळ भागात आणि डबक्यात पाणी साचलले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. शुद्ध पाणी आणि साचलेल्या अशुद्ध पाण्यातून डासांची पैदास होत आहे. हे डास चावल्यानं डेंग्यू चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
डेंग्यू हा शुद्ध पाण्यातील एडीस डास चावल्यान होतो. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला ताप येणे, अंग दुखीची लक्षण जाणवतात. त्याचबरोबर ताप ओसरल्यानंतर लालसरपणा येणं, हाता पायाला खाज सुटते. पित्ताशय सुज येऊन रुग्णाला धाप लागते. रूग्णाच्या पांढऱ्या पेशीही कमी होतात. त्यामुळे डेंग्यूची लक्षणं जाणवताच त्वरित वैद्यकीय उपचार घेण गरजेचे आहे.
राज्यात पुढील काही दिवस अजूनही पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत आहे. त्यामुळे येत्या काळात अजून साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची आणि बळी जाण्याची भीती आहे. राज्या भोवती डेंग्यूचा विळखा अजून वाढण्याची शक्यता आहे.