मी बॅटिंग करायचो, पण फिल्डिंगवेळी पळून जायचो : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jan 11, 2020 | 4:05 PM

पिंपरी चिंचवडमध्ये मोरया यूथ फेस्टिव्हलचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाले. यावेळी सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि भाजप नेते सचिन पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेतली.

मी बॅटिंग करायचो, पण फिल्डिंगवेळी पळून जायचो : देवेंद्र फडणवीस
Follow us on

पुणे : “माझा स्वभाव शांत आहे, पण अनेकांना वाटत नाही. लहानपणी मी खोड्या करत नव्हतो पण खोड्यांचा साक्षीदार असायचो. मी सीझनल खेळ खेळायचो. बॅटिंग केली की मी फिल्डिंग करत नव्हतो तिथून पळून जात होतो”, अशा शालेय जीवनातील आठवणींना माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis interview Rahul Solapurkar) यांनी उजाळा दिला. तसेच मी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमास ‘पुन्हा येईन’ असे सांगतच सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. (Devendra Fadnavis interview Rahul Solapurkar)

पिंपरी चिंचवडमध्ये मोरया यूथ फेस्टिव्हलचे उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाले. यावेळी सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि भाजप नेते सचिन पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेतली.

विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधण्यात त्यांना वेळ अपुरा पडला. तेंव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी स्वतंत्र वेळ द्या अशी विनंती करण्यात आली. याला उत्तर देताना या कार्यक्रमासाठी “मी पुन्हा येईन” असं मिश्किल विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला.

जगातले सर्वात मूर्ख आपणच

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शालेय जीवनातील गमती जमती सांगितल्या.

“विद्यालयीन आणि महाविद्यालयीन काळात मी डिबेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी पाच ते सात मिनिटांचे मी भाषण पाठ करून आलो. पहिल्या दोन मिनिटांच्या भाषेत एक छोटीशी कविता सादर केली. उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यामुळे मला काही सेकंद थांबावं लागलं. पण त्यावेळी मी पुढचं विसरलो अन् गडबडून गेलो. ती वेळ मी मारून नेली, पण नंतर मी जाहीर बोलायला घाबरलो. अनेकांनी विनवण्या केल्या, काहींनी दिलेले सल्ले अवलंबले. तरीही भीती जात नव्हती, अशात एक सल्ला मिळाला. सर्वात मूर्ख लोक आपल्यासमोर बसलेत आणि जगात आपल्यापेक्षा हुशार कोणी नाही असं समजून बोलायचं. तो सल्ला मी अवलंबला आणि मी व्यक्त झालो.’

त्यावर राहुल सोलापूरकर यांनी ‘सध्या हेच धोरण अवलंबता का?’ हा प्रतिप्रश्न केला. त्यावर ‘नाही, ते तेव्हाच विसरलो. पण, आज माझ्या लक्षात आलं की जगातले सर्वात मूर्ख आपणच असतो.’, असं फडणवीसांनी प्रतिउत्तर देताच सभागृहात हशा पिकला.