कपिल देशपांडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका टीव्ही मालिकांना बसला आहे. शूटिंग सुरु असलेल्या सेटवर आणि सेटबाहेर पाणी साचल्यानं अनेक मराठी मालिकांचे शूट रद्द झालं आहे. झी युवाच्या फुलपाखरु, तू अशी जवळी राहा, वर्तुळ, एक घर मंतरलेलं, आलमोस्ट सुफल संपूर्ण या सगळ्या मालिकांच शूट रद्द झालं आहे. तर झी मराठीच्या’ माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेचं शूटही पावसाने प्रभावित झालं.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील जिवलगा, मोलकरीण बाई आणि छत्रीवाली या मालिकेचं शूट रद्द झालं आहे. तर सोनी मराठीच्या ‘हम बने तुम बने’, मी तुझीच रे, सारे तुझ्याचसाठी, एक होती राजकन्या या सगळ्याच मालिकांचं चित्रीकरण रद्द झालं आहे.
मुंबईत पावसाचा हाहाकार
मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पावसामुळे मुंबईसह इतर सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा जोर पाहता प्रशासनाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मुंबईसह वसई-विरार, ठाणे-कल्याण, शहापूर या भागात दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढलं आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाची सतंतधार आजही सुरु आहे. यामुळे मुसळधार पावसामुळे मुंबईसह इतर ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी तुंबले. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्ते, रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखणाऱ्या रेल्वेच्या तिन्ही लाईन्स ठप्प झाल्या आहेत.
मुख्यमंत्री आपत्कालिन विभागात
मुंबईतील तुफान पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या आप्तकालीन विभागाला भेट दिली. मुंबईतील परिस्थितीचा आढाव घेऊन त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. “मुंबईत गेल्या 4 चार दिवसा अतिवृष्टी झाली. महिनाभराचा पाऊस 4 दिवसात झाला. येत्या 3-4 दिवसात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांनी सतर्कता बाळगावी” असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. तसेच आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून 5 लाख तर महापालिकेकडून 5 लाख देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
नवाब मलिका यांच्या घरात पाणी
मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी साचलं आहे. नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सीएमओ महाराष्ट्र आणि शिवसेनेला टॅग केलं आहे. त्यासोबत करुन दाखवलं अशी टॅगलाईन दिली.