एकट्या शेतकऱ्याने शिवरायांचा पुतळा उभारला!

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची राज्यात आणि देशात कमी नाही. त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम करणाऱ्यांची उणीव मात्र पावला-पावलावर जाणवते. मात्र, बीडमधील आसाराम अबूज आणि राधाबाई अबूज या शेतकरी दाम्पत्याने स्वखर्चाने छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उरला आहे. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून, गावगाडा चालावा, अशी […]

एकट्या शेतकऱ्याने शिवरायांचा पुतळा उभारला!
Follow us on

महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची राज्यात आणि देशात कमी नाही. त्यांचे विचार पोहोचवण्याचं काम करणाऱ्यांची उणीव मात्र पावला-पावलावर जाणवते. मात्र, बीडमधील आसाराम अबूज आणि राधाबाई अबूज या शेतकरी दाम्पत्याने स्वखर्चाने छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उरला आहे. शिवरायांच्या स्वराज्याची संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून, गावगाडा चालावा, अशी अबूज दाम्पत्याची या पुतळा उभारणीमागे भूमिका आहे.

शेतीतून मिळालेल्या पैशातून छत्रपती शिवारायांचा पुतळा

बीड तालुक्यातील रंजेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा पाहून इथून येणा-जाणाऱ्या भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. हा पुतळा कुण्या नेत्याने नाही, ना कुणी गावातील लोकांनी एकत्रित येऊन बांधला,  तर हा अश्वारुढ पुतळा आसाराम अबूज आणि राधाबाई अबूज या शेतकरी दाम्पत्याने बांधला आहे. गावातील तरुण पिढीला शिवाजी महाराजांचे आचार-विचार कळावे, रयतेचं राज्य सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर यावं आणि यावरच गावगाडा चालावा, हाच निखळ उद्देश घेऊन अबूज दाम्पत्याने पुतळा गावात उभा केला आहे. यासाठी आसाराम अबूज यांनी कोणाकडूनही दमडी मागितली नाही. शेतातून मिळालेल्या उत्पन्नातून उरलेल्या पैशात आसाराम यांनी हा शिवरायांचा पुतळा उभा केला  आहे.

शिवरायांचा पुतळा उभारण्यामागचा उद्देश

गावातील तरुण योग्य दिशेने गेला पाहिजे. त्याचबरोबर समाजात शांतता नांदली पाहिजे. गावाचा कारभार शिवरायांच्या आदर्श प्रमाणे आणि त्यांच्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वाप्रमाणे चालावा हा उद्देश मनाशी बाळगून आसाराम अबूज यांनी हा पुतळा उभा केला आहे.

कोण आहेत आसाराम अबूज?

आसाराम अबूज यांच्याकडे 13 एकर 20 गुंठे शेती आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते सतत दुष्काळाशी दोन हात करतात . गावात शिवरायांचा पुतळा उभा करायचा, हा त्यांचा एकमेव संकल्प होता. त्यांच्या या संकल्पनेला घरातील कुटुंब सदस्यांनीदेखील हातभार लावला. समाजाला काहीतरी देणे आहे, हाच पण उराशी बाळगत संपूर्ण कुटुंब आसाराम यांच्या पाठीशी उभा राहिला. दोन वर्षात अखेर आसाराम यांनी हा पुतळा उभा केला. पुतळ्याच्या बाजूलाच आई भवानीचं मंदिरही साकारण्यात आलंय. शिवरायांचा पुतळा उभा केल्याचा आनंद आज या कुटुंबाला गगनात मावेनासा झाला आहे.

पुतळा पाहण्यासाठी गर्दी, मदतीचे हातही पुढे

स्वखर्चाने शिवरायांचा पुतळा उभा करणारा हा अवलिया शेतकरी पहिलाच ठरला आहे. पुतळा पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक आता या गावात येऊ लागले आहेत. आर्थिक अडचणीवर मात करुन उभे केलेल्या पुतळ्याचे उर्वरित पुढील काम करण्यासाठी आता सामाजिक संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. सुशोभीकरणासाठी येणाऱ्या पुढील खर्च राजमुद्रा या सामाजिक संघटनेने उचलला आहे.  त्यामुळे या पुतळ्याचे सौंदर्य आणखीन उजळ होण्यास आता मदत होणार आहे.

शेतकऱ्याच्या हिंमतीचे शिवप्रेमींकडून कौतुक

अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक बनवण्याची घोषणा राज्य सरकारकडून चार वर्षांपूर्वी झाली होती. मोठ्या डामडौलात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आलं होतं. परंतु चार वर्षापासून पायाभरणी करण्यासाठी या सरकारला सवड मिळत नाही, तर दुसरीकडे मात्र कोणाकडेच हात न पसरता या शेतकऱ्याने स्वतःच्या घामाचा पैसा लावून हा पुतळा उभा केला आहे.  इच्छाशक्तीच्या जोरावर काहीही शक्य आहे पण या सरकारची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप शिवप्रेमी करत आहेत.  सरकारने निदान आसाराम अबुज या शेतकऱ्याचा बोध घ्यावा.  असाही सल्ला शिवप्रेमीने सरकारला दिला आहे.