वर्ध्यात सैराटची पुन्नरावृत्ती, तलवारीने वार करत बहिणीच्या प्रियकराचा खून

| Updated on: Jul 14, 2019 | 11:51 AM

प्रेमप्रकरणातून पुलगावात एका युवकाची निर्घून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री (12 जुलै) घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वर्ध्यात सैराटची पुन्नरावृत्ती, तलवारीने वार करत बहिणीच्या प्रियकराचा खून
Follow us on

वर्धा : प्रेमप्रकरणातून पुलगावात एका युवकाची निर्घून हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री (12 जुलै) घडली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या काळोख्यात दुचाकीने येत दोन युवकांनी तलवारीने वार करत ही हत्या केली. जयकुमार वाणी असं मृत तरुणाचं नाव आहे. पुलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मृतक जयकुमारचे आरोपी अक्षय माहूरेच्या बहिणीसोबत प्रेमसंबध होते. याचाच राग मनात ठेवून अक्षयने त्याच्या मित्रासह जयकुमारची हत्या केली. प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येचा गावकऱ्यांनीही निषेध केला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

मृतक जयकुमार पुलंगावच्या भीम नगर परिसरात राहत होता. जयकुमारचा डीजेचा व्यवसाय होता. शुक्रवारी मृतक हा तेलघाणी फैलातून पायदळ जात असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला एवढा जबरदस्त होता की जयकुमारचा जागीच मृत्यू झाला. आशिष लोणकर आणि अक्षय माहूरे यांनी हा हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपासचक्र फिरवली मात्र आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला होता. आरोपीच्या शोधाकरिता पोलिसांनी अमरावती, नागपूर आणि यवतमाळ येथे तीन पथक रवाना करत आरोपीनां अटक केली.