बीड : हवामान विभागाचा पावसाचा अंदाज चुकला तर, आम्ही हवामान विभागाला टाळे ठोकू, असा इशारा बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने दिला आहे. हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. मात्र सतत हवामान विभागाच अंदाज चुकत असल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. यंदा जर हवामान विभागाचा अंदाज चुकला तर शेतकरी संघटना हवामान विभागाला टाळे ठोकणार आहे.
या सर्व प्रकाराबाबत यापूर्वीच शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन हवामान विभागाच्या फसव्या अंदाजाबाबत सांगितलेले आहे. मागील चार-पाच वर्षांपासून हवामान विभाग सांगत असलेला अंदाज चुकत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. दरवर्षी हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार शेतकरी शेतात बियांणाची पेरणी करतो. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या कारणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने मान्सूनचा खोटा अंदाज सांगू नये, यामुळे शेतकऱ्याचे किमान बी-बियाणांची तरी पैसे वाचतील आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. अस मत बीड येथील शेतकरी संघटनेचे नेते गंगाभिषण थावरे यांनी मांडले आहे.
देशातील प्रत्येक शेतकरी हा हवामान विभागावर अवलंबून राहून शेतीचे नियोजन करतो. यंदाही 4 ते 6 जून पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी हवामान विभाग मान्सुन दाखल होण्याचा अंदाज वर्तवते, यंदाही हवामान विभागाने 4 ते 6 जून दरम्यान मान्सुन केरळात दाखल होण्याची माहिती दिली आहे. पण आज (2 जून) आंध्र प्रदेशमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.