जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, ग्रामस्थांचं स्थलांतर

| Updated on: Jul 07, 2019 | 10:44 AM

भोकरदन तालुक्यातील शेलुद धामणा धरण गुरुवारी रात्रीपासून ओव्हरफ्लो झालं आहे. धामना ओसंडून वाहू लागताच सगळ्या परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली आहे.

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, ग्रामस्थांचं स्थलांतर
Follow us on

जालना : भोकरदन तालुक्यातील शेलुद धामणा धरण गुरुवारी रात्रीपासून ओव्हरफ्लो झालं आहे. धामना ओसंडून वाहू लागताच सगळ्या परिसरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शेलुद येथील 200 कुटुंबातील 2 हजार 658 ग्रामस्थांना तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित केले आहे.

भोकरदन तालुक्यातील रायघोळ नदीच्या पात्रात गुरुवारी झालेल्या पावसामुळे रात्री उशिरापासून या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. तर दुसरीकडे धामना सांडव्याच्या भिंतीतून आधीच मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिवरे धरणफुटीची दुर्घटना होते की काय अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. या कारणामुळे शेलुद येथील स्थानिकांना सरस्वती विद्यालय, जिल्हा परिषद शाळेत तात्पुरती निवाऱ्याची सोय केली आहे.

शेलुद येथील धामना सांडवा ओव्हरफ्लो झाल्याने खबरदारी उपाय संभाव्य आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सज्ज झालं आहे. भोकरदन नगर परिषदेतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच  बचाव कार्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन आणि बचावकार्यासाठी वापरण्यात येणारी पाण्यातील रेस्क्यू बोटसह अग्निशमन दलाचे अधिकारीही गावात तळ ठोकून आहेत.

त्याशिवाय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी नगर परिषद, आरोग्य विभाग, मृद आणि जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण कंपनी,जलसंपदा, पशुसंवर्धन, कृषी, पंचायत समिती, दूरसंचार आणि शिक्षण विभागाच्या 31 अधिकाऱ्यांच्या सेवा शुक्रवार पासून भोकरदन तहसील कार्यालयात वर्ग केल्या आहेत.

दरम्यान,  धामना धरणाच्या भिंतीवरील वाढलेली झाडे काढली नसल्यामुळे औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांची गुरुवारी( 4 जुलै) चांगलीच कान उघाडणी केली.

आयुक्त केंद्रेकरांच्या सुचनेनंतर धामना मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याची गळती थांबवण्यासाठी सिमेंटच्या सहाय्याने पिचिंगमध्ये पडलेल्या भेगा बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. सांडव्याच्या आतील बाजूस मुरुमाची भिंत उभी करता येईल का याची चाचपणी सुरू आहे. धरणाच्या भिंतीवर उगवलेली झाडे तोडण्यात येत आहेत. सध्याच्या घडीला पाण्याचा मोठा प्रवाह सांडव्यावरून वाहत असल्याने सांडव्याची  काही दुरूस्ती  करता येत नाही. शेलुद ग्रामपंचायतमध्ये कंट्रोल रुम उभारण्यात आली आहे. धामना सांडव्यासाठी संभाव्य आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे.

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका