तासगाव (सांगली) : राजकीय नेते म्हटल्यावर कुणाही नेत्याचा एखादा गंभीर चेहराच समोर येतो. हे राजकीय नेते केवळ आंदोलने, मोर्चे, सत्ता, टीका, विरोध, निषेध इत्यादी शब्दांच्या पलिकडे जातच नाहीत की काय, असेही वाटून जाते. मात्र, राजकारणाच्या पलिकडे जात, आपले वैयक्तिक स्वभाव-गुण अत्यंत प्राणपणाने जपणारे सुद्धा कमी नाहीत. त्यांची संख्या कमी असेल, पण राजकीय क्षेत्रातही संवेदनशील आणि मनमिळाऊ स्वभावाची माणसं आहेत. सांगलीतील एका प्रसंगात असेच समोर आले. हा प्रसंग आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत.
त्याचं झालं असं की, जयंत पाटील हे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे दौऱ्यानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी तासगावातील तुरची या गावातील आश्रमशाळेला भेट दिली. मग काय, लहान-सहान मुलांसोबत गप्पा मारण्यात जयंत पाटील अगदी हरवून गेले. त्या मुलांमधील एक होत जयंत पाटील यांनी एक-एका मुलाशी संवाद साधला. त्यांचं नाव-गाव विचारलं, आवड-निवड विचारली.
यावेळी आश्रामशाळेतील मुलांना नावं विचारत असातना, एका मुलाने त्याच्या गावाचं नाव ‘इस्लामपूर’ सांगितलं. मग काय… जयंत पाटील यांचे डोळे चमकले आणि क्षणाचा विलंब न करता हात पुढे केला व हस्तांदोलन केलं. आपल्याला माहितंच आहे की, जयंत पाटील यांचं गावही इस्लामपूर आहे. त्यामुळे आपला ‘गाववाला’ आहे म्हटल्यावर जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटून आला!
आश्रमशाळेत आपल्या गावातील मुलगा भेटल्यावर आनंद व्यक्त करताना सुद्धा जयंत पाटील यांनी म्हटलंय की, “मला माझा बालमित्रच भेटावा इतका आनंद झाला. आणि माझे हात त्याच्याशी हस्तांदोलन करण्यास सरसावले. त्या दोन हातांतून मला प्रचंड ऊर्जा मिळाली.”
राजकारणात वावरत असताना कायम टीका-टीपण्णी सुरु असते, आंदोलने-मोर्चे सुरु असतात, धावपळ सुरु असते. अशातही आपल्याली संवदेनशीलता, मनमिळाऊपणा टिकवून ठेवणारे नेते क्वचित आढळतात. जयंत पाटील यांच्या तासगावातील या छोट्याशा कृतीतून त्याचा प्रत्यय आला.
पाहा व्हिडीओ :
आज तुरची ता. तासगाव येथील आश्रम शाळेला भेट दिली. लहान मुलांच्या सोबत गप्पा रंगल्या होत्या. इस्लामपूरचं आणि माझं नातं इतके घट्ट राहिले आहे की, मुलांच्या सोबत गप्पा मारताना जेव्हां एका मुलाने त्याचे गाव ‘इस्लामपूर’ असे सांगितले तेंव्हा मला माझा बालमित्रच भेटावा इतका आनंद झाला. pic.twitter.com/ys8zeef82i
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 28, 2018