कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजे 23 मे रोजी जाहीर होणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ठिकठिकाणी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. या अंतर्गत कोल्हापूर पोलिसांनी उपमहापौरांसह आजी-माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत.
लोकसभा निकाल मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची कारवाई करण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यावर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कोल्हापूर पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. मात्र, पोलिसांनी सूडबुद्धीने नोटिसा पाठवल्या असल्याच्या भावना ज्यांना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्यात, त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.
“तुमच्या विरुद्ध असलेल्या गुन्ह्यांचे व संभाव्य हालचालीचे अवलोकन केल्यानंतर आमची अशी धारणा झाली आहे की, निवडणूक निकालाच्या काळात तुमच्या हालचाली आणि कारवायांमुळे सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षिततेस धोका पोहोचण्याचा संभव आहे. तसेच, तुमच्या उपस्थितीमुळे आणि कारवायामुळे परिसरातील सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे.” असे नोटिसांमध्ये पोलीस प्रशासनाकडून म्हटलं गेलंय.
दरम्यान, उद्या म्हणजे 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. देशभरात सात टप्प्यात आणि महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यात मतदान पार पडलं. कोल्हापुरात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघ अशा दोन मतदारसंघातही मतदान झालं. दोन्ही ठिकाणी अटी-तटीची लढत झाली. त्यामुळे कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.