आधी दरावरुन वाद, आता पालिकेच्या धाडी, कोल्हापुरातील मटणकोडींचा पर्यटनाला फटका

| Updated on: Jan 10, 2020 | 1:44 PM

कोल्हापूरमध्ये मटण कोंडीचा फटका आता हॉटेल व्यवसायाबरोबरच पर्यटनालाही बसू लागला आहे. या दोन्ही क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे (Lack of mutton affect on tourism).

आधी दरावरुन वाद, आता पालिकेच्या धाडी, कोल्हापुरातील मटणकोडींचा पर्यटनाला फटका
Follow us on

कोल्हापूर : एकीकडे न परवडणारा मटणाचा दर तर दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेकडून सुरू असलेली कारवाई यामुळे कोल्हापुरातील मटण विक्रेत्यांनी मटण विक्री बेमुदत बंद केली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात मटण कोंडी निर्माण झाली आहे (Lack of mutton affect on tourism).

मटण कोंडीचा फटका आता हॉटेल व्यवसायाबरोबरच पर्यटनालाही बसू लागला आहे. या दोन्ही क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे (Lack of mutton affect on tourism). शिवाय या तिढ्यामुळे मटण दुकानाबरोबरच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापुरात गेल्या दोन महिन्यांपासून मटणवरुन गदारोळ सुरू आहे. आधी मटणाचा दर आणि त्यानंतर आता दर्जा यावरुन दरवाढ कृती समिती आणि मटण विक्रेत्यांमध्ये जुंपली आहे. प्रतिकिलो 480 रुपये असा तोडगा निघाल्यानंतर मटण विक्रेत्यांनी मटण विक्री सुरु केली. मात्र आता अन्न आणि औषध प्रशासन तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मटण दुकानांवर छापासत्र सुरु झाले. यामुळे हा मटणाचा तिढा आणखीनच वाढला आहे.

बेमुदत मटण विक्री बंद करुन विक्रेत्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापुरात मटणाचा तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्याचा फटका आता हॉटेल व्यवसायाला बसायला लागला आहे. मटणासाठी आसुसलेल्या खवय्यांना हॉटेलमध्ये मटण मिळत नसल्याने त्यांनी हॉटेलकडे पाठ फिरवली आहे.

मटण मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिकांनी चिकनवर आपला भर दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळेल या अपेक्षेने हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांना नाईलाजाने मटणाचा ताव चिकनवर काढावा लागतोय.

कोल्हापुरात कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा आणि मटण मिळणारी 500 पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत. यामध्ये दररोज सरासरी पाच ते सात हजार किलो मटणाची आवश्यकता असते. मटण दुकानापासून ते हॉटेलपर्यंत 15 ते 20 हजार कामगार मटणाशी निगडीत आहेत. त्यामुळे मटणाच्या दरावरुन सुरु झालेला हा वाद आता दर्जावर आला असला तरी यावर वेळीच तोडगा निघणार गरजेचे आहे.