लातूर: एकाच कुटुंबातील चार मुलींना दुधातून विषबाधा होऊन, 3 वर्षीय जुळ्या बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. दोन बहिणींचा मृत्यू तर अन्य दोन बहिणींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औसा तालुक्यातील उजनी इथे ही धक्कादायक घटना घडली. मारिया आणि आलमास रुईकर अशी मृत्यू झालेल्या चिमुकलींची नावं आहेत.
उजनी येथील अयुब रुईकर यांना 5 मुली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी पाचही जणींना दूध प्यायला दिलं. दूध प्यायल्यानंतर पाचही जणींना उलटीचा त्रास सुरु झाला. यामध्ये मारिया हिचा उपचारासाठी दाखल करताना वाटेतच मृत्यू झाला. तर आलमास हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
या घटनेत अन्य दोन बहिणी महक (वय 11) आणि सुहाना (वय 8) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारानंतर औसा तालुक्यातील उजनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुधातून नेमकी कशी काय विषबाधा झाली हा एकच प्रश्न सर्वत्र चर्चीला जात आहे.