लातूर : राज्यातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूरमधल्या सुशील चिकटे या व्यक्तीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी पोस्टातील आवर्ती ठेव अर्थात आरडी केलेले दहा लाख रुपये प्रकाश आंबेडकर यांना आर्थिक पाठबळ म्हणून दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांना कोणी शंभर रुपये देत आहे,तर कोणी लाख रुपये. काही महिलांनी तर आपले सोन्याचे दागिनेही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आपण बाबासाहेबांचे देणे लागतो ही भावना मुळात आंबेडकरी जनतेत आहे. त्यामुळं प्रकाश आंबडेकरांनी उभारलेल्या वंचित आघाडीकडे लोक मोठ्या सहानुभूतीने पाहत आहेत. प्रकाश आंबेडकरांनी या निवडणुकीत ” मत दो और नोट भी दो” चे आवाहन केले.
या आवाहनानंतर ग्रामीण आणि शहरातून लोकांनी अगदी शंभर रुपयापासून लाख रुपयापर्यंत मदत पाठवली आहे. फायनान्स आणि इतर व्यवसाय करणाऱ्या लातूरच्या सुशील चिकटे आणि कुटुंबीयांनी त्यांची मुलगी ऐश्वर्याच्या लग्नासाठी पोस्टात आरडी करुन बचत केलेले दहा लाख रुपये अहमदपूरच्या जाहीर सभेत प्रकाश आंबेडकरांना दिले. दहा लाख दिल्याचं कळताच सोशल मीडियात सुशील चिकटे यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.