औरंगाबाद : गेल्या 9 ऑगस्टपासून सुरू केलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला (artificial rain marathwada) आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. अमेरिकेहून आलेल्या विमानाने मराठवाड्याच्या आकाशात घिरट्या (artificial rain marathwada) घालायला सुरुवात केली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. कृत्रिम पावसाचं विमान ज्या भागातून फिरलं, त्या भागात सध्या हलकासा का असेना पाऊस पडत आहे. या पावसाने यावर्षीचा मराठवाड्यातील दुष्काळ तर संपणार नाही. पण प्रयोगाला येत असलेल्या यशामुळे दुष्काळझळा सोसणाऱ्या मराठवाड्याच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.
वर्षाचे बारा महिने दुष्काळी झळा सोसणारा मराठवाडा… पावसाळा सुरू झाला तरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना पावसाची चातका प्रमाणे वाट बघावी लागते. कधी कुठे भूरभूर झाली तर शेतकरी पेरणी करतात आणि पुन्हा पावसाने दडी मारली की जमिनीतून उगवून आलेल्या पिकावर शेतकऱ्यांना नांगर फिरवावा लागतो. हे चित्र मराठवाड्यासाठी नेहमीचंच झालंय. पण हे चित्र आता बदलण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण मराठवाड्यात सुरू असलेल्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला काही प्रमाणात यश मिळताना दिसत आहे.
21 ऑगस्टच्या दुपारी जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील आकाशात विमानाने घिरट्या घातल्या. सोडियम क्लोराईडचे सिलेंडर घेऊन हे विमान आकाशात दाटलेल्या ढगांवर क्लोराईडचा मारा करत होतं. विमान निघून गेल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी या परिसरात पाऊस पडायला सुरुवात झाली. घनसावंगी तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी विमान फिरून गेल्यानंतर पाऊस पडल्याचं सांगितलं.
विमानाने घिरट्या घातल्यानंतर औरंगाबाद शहरातही चांगला पाऊस झाला. हा नेहमीचा नैसर्गिक पाऊस नव्हता, तर विमानाने ढगात सोडलेल्या सोडियम क्लोराईडमुळे पडत असलेला कृत्रिम पाऊस होता. पण काही अभ्यासकांच्या मते हा पाऊस निसर्ग चक्रासाठी धोकादायक ठरू शकतो आणि या प्रयोगाचा म्हणावा तितका फायदा होणार नाही.
कृत्रिम पावसाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात राबवला गेला तर मराठवाड्यातला दुष्काळ हा इतिहास जमा होऊ शकतो. नापिकीमुळे आत्महत्या करून मारणारे शेतकरी, पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला, चाऱ्यासाठी महिनोमहिने छावणीवर अडकून पडलेली जनावरं आणि जिकडे पहिल तिकडं भकास दिसणारं चित्र बदलता येऊ शकतं. पण यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु ठेवण्याची गरज आहे. शिवाय नैसर्गिक परिणाम लक्षात घेणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.