इथे ओशाळली माणुसकी, कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मुलुंड ते भिवंडी जीवघेणा ट्रिपल सीट प्रवास

| Updated on: Apr 11, 2020 | 4:08 PM

मुंबईत एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं या रुग्णाला आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीमार्फत मुंलुंड ते भिवंडी असा ट्रिपल सीट प्रवास करावा लागला (Cancer patient journey during lockdown).

इथे ओशाळली माणुसकी, कॅन्सरग्रस्त रुग्णाचा मुलुंड ते भिवंडी जीवघेणा ट्रिपल सीट प्रवास
Follow us on

ठाणे : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून (Cancer patient journey during lockdown) देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. या लॉकडाऊनदरम्यान लाखो लोकांची भूक भागवण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत एका कॅन्सरग्रस्त रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं या रुग्णाला आपल्या पत्नी आणि मुलासह दुचाकीमार्फत मुंलुंड ते भिवंडी असा ट्रिपल सीट प्रवास करावा लागला (Cancer patient journey during lockdown).

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरात वास्तव्यास असणारे विरस्वामी कोंडा यांना कर्करोगनं ग्रासलं होतं. त्यांच्या पत्नी लक्ष्मी कोंडा यांनी खाजगी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना मुंबई टाटा कर्करोग रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे तीन महिने थांबल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी आणखी दोन महिने थांबावं लागेल, असं सांगण्यात आलं. अखेर मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात कोंडा यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी कोंडा यांना डिस्टार्ज दिला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या नाकातील नळी बदलणं किंवा इतर उपचारासाठी भिवंडी ते मुलुंड असा प्रवास करणं परवाडणारं नव्हतं. त्यामुळे कोंडा यांच्या पत्नी लक्ष्मी कोंडा यांनी मुलुंडच्या एका गुरुद्वारात राहण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊनमुळे तेथील व्यवस्थापकांनी त्यांना घरी जाण्यास सांगितलं.

रुग्णाला घरी आणण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. काही रुग्णवाहिकेचे मालक जास्त भाडे मागत होते. त्यामुळे अखेर रुग्णाचा मुलगा राजू कोंडा यांनी आपल्या आईला आणि वडिलांना दुचाकीवरुन घरी नेण्याचं ठरवलं. ते ट्रिपल सीट घरी निघाले. यावेळी त्यांच्याजवळ तीन-चार पिशव्यादेखील होत्या.

या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर त्यांना जाऊ दिलं. मात्र, कुणीही रुग्णवाहिका किंवा वाहनांची व्यवस्था करुन दिली नाही. दरम्यान, ठाण्यात रस्त्यावर त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. अशा अवस्थेत एक नागरिक देवदूत बनून आला. त्याने आपल्या दुचाकीमधून पेट्रोल काढून दिले. अखेर रुग्णासह 25 किलोमीटर ट्रिपल सीटचा प्रवास करुन ते भिवंडीला आपल्या राहत्या घरी पोहोचले.