पांघरायला चादर न दिल्याने वेटरकडून हॉटेल मालकाची हत्या

| Updated on: Feb 26, 2020 | 10:25 AM

केवळ पांघरायला चादर न दिल्याच्या रागातून हे हत्याकांड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hotel owner killed by waiter)

पांघरायला चादर न दिल्याने वेटरकडून हॉटेल मालकाची हत्या
Follow us on

नागपूर : पांघरायला चादर न दिल्याने वेटरने हॉटेल मालकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना (Hotel owner killed by waiter) नागपुरात घडली. याप्रकरणी आरोपी वेटरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील देवलापार इथे काल ही धक्कादायक घटना घडली. केवळ पांघरायला चादर न दिल्याच्या रागातून हे हत्याकांड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hotel owner killed by waiter)

प्रकाश बालगोविंद जयस्वाल असं 53 वर्षीय दुर्दैवी हॉटेल मालकाचं नाव आहे. प्रकाश जयस्वाल यांचं वडंबा शिवारात हॉटेल आहे. त्यांच्याकडे 50 वर्षीय कारा नारायण सिंह बावद नावाचा वेटर काम करत होता. तो थोडा रागीट आणि लहरी स्वभावाचा होता.

रात्री झोपल्यानंतर काराने पहाटे थंडी वाजत असल्याने त्याने मालक प्रकाशला चादर मागितली. मात्र, प्रकाश यांनी चादर न दिल्याने, काराने त्यांना लाकडी काठीने मारुन गंभीर जखमी केले. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या प्रकाश जयस्वाल यांचा काल दुपारी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी वेटरला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.

क्षुल्लक कारणांमुळे झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे नागपुरात हत्या, चोरी, मारामाऱ्या या नित्याच्याच बनल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात अशा घटनांची एक मालिकाच सुरु आहे. टोळीयुद्ध, वाहनांची जाळपोळ यासारख्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.