नवी दिल्ली : तुम्हाला कुणी सांगितलं की नेदरलँडमध्ये रामराज्य आलंय, तर तुमचा विश्वास बसेल का? पण हा विश्वास ठेवावा लागेल. कारण नेदरलँडमध्य रामराज्य आलंय. पावणे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या नेदरलँडमध्ये तुरुंगाची गरजच उरलेली नाही. नेदरलँडमधील गुन्हेगारीचा आलेख एवढा खाली आलाय, की तुरुंगांची जागा वापरण्यासाठी आता नवा मार्ग शोधला जातोय.
2013 मध्ये संपूर्ण नेदरलँडमधील तुरुंगात फक्त 19 कैदी होते. 2018 येईपर्यंत हे कैदीही उरले नाहीत आणि तुरुंग रिकामे आहेत. नेदरलँडच्या न्याय मंत्रालयाच्या मते, येत्या पाच वर्षात एकूण गुन्हेगारीत 0.9 टक्क्यांची घट निश्चित आहे. यानंतर सर्व तुरुंग बंद करण्याचं नियोजन सुरु आहे. विशेष म्हणजे तुरुंग बंद होण्यास 2016 पासूनच सुरुवात झालेली आहे. एम्सटर्डम आणि बिजल्मबर्ज या दोन जेलला टाळं ठोकण्यात आलंय. हे दोन जेल तोडून शरणार्थींसाठी एक केंद्र सुरु केलंय आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जात आहे.
गुन्हेगारी कमी होणं आणि तुरुंग बंद होणं ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे. पण यामुळे एक फटकाही बसतोय. तुरुंगात काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना घरी बसायची वेळ आली आहे. जवळपास दोन हजार लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. 700 कर्मचाऱ्यांना दुसऱ्या विभागात शिफ्ट करण्यात आलंय, पण 1300 कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याचं संकट आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ नये यासाठी नेदरलँडने बाजूला असलेल्या नॉर्वे या देशातून कैद्यांची आयात केली. नेदरलँडमधील तुरुंग अत्यंत आधुनिक आहेत. इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटरिंग सिस्टमच्या माध्यमातून कैद्यांच्या पायाला असं उपकरण लावलं, जातं, ज्यामुळे कैदी एका विशिष्ट हद्दीच्या बाहेर जाऊ शकत नाही. ही हद्द ओलांडल्यास पोलिसांना सूचना मिळते.
नेदरलँडचे जेल अगोदरपासूनच आदर्श जेल मानले जातात. कारण, इथे कैद्यांना शिक्षा देण्यापेक्षा त्यांना काम देऊन मुख्य प्रवाहात आणण्यावर जोर दिला जातो. त्यामुळेच नेदरलँडमधील जेल आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. इथे ना गुन्हेगारी आहे, ना कैदी.
नकाशात पाहा कुठे आहे नेदरलँड?