नवी दिल्ली : मोदी सरकारने पहिल्याच कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पीएम किसान योजनेचा लाभ आता देशातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपये देण्यात येतात. कॅबिनेटने अटी शिथिल केल्यामुळे देशातील 15 कोटी शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ होईल. यापूर्वी दोन हेक्टर म्हणजे पाच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ दिला जात होता.
मोदी सरकारचं हे मोठं पाऊल मानलं जातं. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने अनेक उपाययोजना आखल्या आहेत. या योजनेतूनही शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या कमी व्हाव्यात या उद्देशातून आर्थिक मदत केली जाते.
भाजपने या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकरी पेन्शन आणि शेतकरी सन्मान योजनेसाठीच्या अटी शिथिल करण्याचं आश्वासन दिलं होतं. शिवाय मध्यमवर्गीयांसाठीही अनेक आश्वासने देण्यात आलेली आहेत. पीएम-किसान योजनेसाठी सध्या काही अटीत आहेत. दोन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या योजनेतील 6000 रुपये रक्कम दिली जाते. पण देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
शहीद पोलिसांच्या मुलांसाठी मोठा निर्णय
राष्ट्रीय संरक्षण निधीतून माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना दरमहिन्याला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. मुलांसाठी ही रक्कम 2000 रुपयांवरुन 2500, तर मुलींसाठी 2250 रुपयांवरुन 3000 प्रति महिना एवढी करण्यात आली आहे.
आतार्यंत या योजनेचा लाभ फक्त निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठीच मर्यादित होता. पण कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ होईल. वाढ केलेली रक्कमही योजनेसाठी पात्र मुलांना मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीने आतापर्यंत लाखो मुलांना मदत केली आहे.