सेऊल: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने सेऊल शांती पुरस्काराने गौरवलं. हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय ठरले. दोन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात मोदींनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ईन यांची भेट घेऊन दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.
मोदींनी सियोल शांती पुरस्कार भारतीय जनतेला समर्पित केला. भारताने नेहमीच जगाला शांततेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या औचित्यावर सियोल शांती पुरस्कार मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे, असं मोदी म्हणाले.
सर्व रक्कम नमामि गंगेला
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या सन्मानाची संपूर्ण रक्कम नमामि गंगा फंडला देणार असल्याचं जाहीर केलं.
दहशतवाद जगभरात चिंतेची बाब
यावेळी पंतप्रधान मोदींनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. जगभरात आज दहशतवाद ही चिंतेची बाब आहे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकजूट होण्याची गरज आहे. विश्वशांतीसाठी दहशतवाद ही गंभीर समस्या आहे, असं मोदींनी नमूद केलं.
मोदींना मिळालेला सन्मान महत्त्वाचा का?
सियोल शांती पुरस्कार 1990 पासून दिला जातो. हा पुरस्कार आतापर्यंत संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यासारख्या दिग्गजांना मिळाला आहे. यामध्ये आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंबर लागला आहे.
या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नामांकने आली होती. पुरस्कार समितीने त्याली 150 नावं शॉर्टलिस्ट केली होती. या 150 नावांमधून पंतप्रधान मोदींच्या नावावर एकमत झालं. त्यामुळे मोदींना ‘द परफेक्ट कँडिटेट फॉर द 2018 सियोल पीस प्राईज’ म्हणून गौरवण्यात आलं.
दक्षिण कोरियाची भारताला साथ
पुलवामा हल्ल्यानंतर जगभरातून भारताला पाठिंबा मिळत आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे ईन यांनी पुलवामा हल्ल्याचा निषेध करत, दहशतवादाविरोधाच्या लढाईत आम्ही भारतासोबत असल्याचं म्हटलं.
The Seoul Peace Prize is dedicated to the people of India & our country’s culture of peace and harmony. https://t.co/ymUdug3JYp
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2019