नाशिक : कांद्याच्या घसरलेल्या दरांनी सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आणलंय. अशाच एका नाशिकमधील शेतकऱ्याने कांदे विकून आलेले 1064 रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. यानंतर या शेतकऱ्याची चौकशीही झाली. आता पंतप्रधान कार्यालयाकडून निफाडमधील शेतकरी संजय साठे यांची मनीऑर्डर परत पाठवण्यात आली आहे. रिटर्न गिफ्ट म्हणून या शेतकऱ्याला त्यांचेच पैसे परत पाठवण्यात आले आहेत.
शेतकरी संजय साठे सोमवारी निफाड पोस्ट ऑफिसमध्ये गेले असता त्यांना 1064 रुपये परत मिळाले. या पैशांची मनीऑर्डर त्यांनी मोदींना पाठवली होती. शेतकऱ्यांना सध्या ज्या आर्थिक परिस्थितीतून जावं लागतंय, त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधणं हा आपला उद्देश होता, असं संजय साठे यांनी म्हटलंय.
29 नोव्हेंबर रोजी 150 रु प्रतिक्विंटल भावाने कांदा लिलाव केल्यानंतर आलेली 1064 रुपये ही रक्कम संजय साठे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथेकडे लक्ष वेधण्यासाठी अभिनव प्रकार केला. टीव्ही 9 मराठी सर्वप्रथम ही बातमी दिली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर या गोष्टीची दखल घेण्यात आली. मातीमोल आणि तोट्यातील कांदा उत्पादकांना यामुळे दिलासादायक पाऊल उचललं जाईल अशी अपेक्षा असणाऱ्या साठे यांची उलटसुलट चौकशी सुरू झाली.
शेतकरी संजय साठे एखाद्या पक्षाशी संबधित आहे का, शेती किती, एखाद्या पक्षाने सांगितल्यावरून हा स्टंट केला का अशा अनेक अंगाने ही उलटसुलट चौकशी होत आहे. त्यामुळे साठे पुरते वैतागले आहेत. यातच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या विषयावर तयार झालेल्या अहवालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यातील आशयावरून त्यांना अधिकच धक्का बसला.