वडिलांनी फी थकवली म्हणून मुलाला तीन तास शाळेत बसवून ठेवलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

लातूर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना लातुरात घडली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून दुसरीतल्या चिमुकल्याला मुख्याध्यापिकेने तीन तास कार्यालयात बसवून ठेवले. ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. लिटील ऐंजल असं या शाळेचं नाव आहे. हा प्रकार करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापिका आणि संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीर शहरातल्या लिटील ऐंजल शाळेत सात वर्षांचा […]

वडिलांनी फी थकवली म्हणून मुलाला तीन तास शाळेत बसवून ठेवलं
Follow us on

लातूर : शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना लातुरात घडली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून दुसरीतल्या चिमुकल्याला मुख्याध्यापिकेने तीन तास कार्यालयात बसवून ठेवले. ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये घडली. लिटील ऐंजल असं या शाळेचं नाव आहे. हा प्रकार करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापिका आणि संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर शहरातल्या लिटील ऐंजल शाळेत सात वर्षांचा चंद्रशेखर स्वामी दुसऱ्या वर्गात शिकतो. त्याच्या वडिलांकडे शाळेची 18 हजार रुपये फी बाकी आहे. आपली आर्थिक अडचण दूर झाली की आपण लगेच पैसे भरु असे चंद्रशेखरचे वडील कार्तिक स्वामी यांनी शाळा प्रशासनाला सांगितले होते. मात्र शाळा प्रशासन फी  भरुन घेण्यासाठी आग्रही होते.

शनिवारी चंद्रशेखर हा नेहमी प्रमाणे स्कूल व्हॅनने शाळेत गेला. शाळा सुटून तीन तास झाले तरी तो परतला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वडील कार्तिक स्वामी हे शाळेत पोहोचले. त्यांना तिथे चंद्रशेखर हा मुख्याध्यापिकेच्या खोलीत बसलेला दिसला. याबद्दल स्वामी यांनी विचारणा केली असता, तुम्ही फी आणली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. वेळोवेळी सांगूनही तुम्ही फी घेऊन येत नाही, म्हणून आम्हाला मुलाला शाळेतच बसवून ठेवावे लागले, असे मुख्याध्यापिकेने सांगितले.

त्यानंतर कार्तिक स्वामी यांनी पोलीस ठाणे गाठत शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा ममदापुरे, संस्थाचालक राजकुमार ममदापुरे आणि शिक्षक सरफराज शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला.

फी  वसुलीसाठी शाळा कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, याचा प्रत्यय या घटनेने आला आहे.