चंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव

| Updated on: Aug 07, 2020 | 11:36 AM

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्यानं, त्यांची नसबंदी करण्याचा विचार वनविभाग करीत आहे. (proposal of tigers sterilization)

चंद्रपुरात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, सल्लागार मंडळाच्या बैठकीत अजब प्रस्ताव
Follow us on

चंद्रपूर : देशाची लोकसंख्या वाढायला लागली, तेव्हा कुटुंब नियोजन ही संकल्पना राबवण्यात आली. आता हीच संकल्पना वाघांच्या संदर्भात राबवण्याचा अजब विचार केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत असल्यानं, त्यांची नसबंदी करण्याचा विचार वनविभाग करीत आहे. हा विचार अजब वाटत असला तरी, तो आज होणाऱ्या राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. (proposal of tigers sterilization chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्याचं नाव येताच डोळ्यासमोर येतात ते पट्टेदार वाघ. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि संपन्न असं घनदाट जंगल, ही या जिल्ह्याची ओळख. आता याच जंगलात 300 पेक्षा जास्त वाघ मुक्तपणे वावरत आहेत. आतातर या वाघांना जंगल अपुरं पडू लागल्यानं ते गावाशेजारी येऊ लागले आणि त्यातून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला. (proposal of tigers sterilization chandrapur)

या वर्षात आतापर्यंत 11 जणांचे बळी वाघाने घेतले आहेत. वाघांची संख्या वाढू लागल्यानं हा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. त्यामुळं यावरचा उपाय शोधला जात आहे. सात ऑगस्ट रोजी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची बैठक होत आहे. त्यात विविध उपायांवर चर्चा होणार आहे. त्यातील एक उपाय वाघांच्या नसबंदीचाही आहे.

नसबंदी केल्यास प्रजनन थांबेल आणि संघर्ष कमी करण्यास मदत होईल, असा अजब तर्क लावला जात आहे. या जिल्ह्यात वाघांचा मृत्यूदर फारच नगण्य आहे. वाघांच्या प्रजननासाठी जिल्ह्यातील वातावरण अतिशय पोषक आहे. त्यामुळं इथं त्यांची संख्या वाढीवर आहे. हे आशादायी चित्र असताना नसबंदी करुन त्यावर कृत्रिम आळा घालण्याची सद्बुध्दी कुठून आली, हे नवलच आहे.

पूर्वी जिल्ह्यातून पन्नासवर वाघांच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हाही विषय बैठकीत मांडला जात आहे. मात्र नसबंदीचा विषय बैठकीच्या अजेंड्यावर आणताना त्याचा कोणताही अभ्यास केला गेलेला नाही. बैठकीला आमंत्रित सदस्यांनाही याची फार कल्पना नाही. त्यामुळं हा प्रयोग किती यशस्वी होतो, हे सांगणं अवघड झालं आहे.

एकीकडे देशात वाघांच्या संख्येवर आणि त्यांच्या अस्तित्वावर चिंता व्यक्त होत असताना आता त्यांचं प्रजननच थांबवणं, हे कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार आता वनविभागानं करण्याची गरज आहे.

(Vasectomy of tiger)

संबंधित बातम्या  

तब्बल 105 दिवसांनी ताडोबाची सफारी सुरु, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

International Tiger Day 2019 : देशात वाघांच्या संख्येत वाढ, महाराष्ट्रात 250 पेक्षा अधिक वाघ