रायगड : गेल्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यातील (Raigad rain) सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरु आहे. यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. जिल्ह्यातील (Raigad rain) अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठावरील गावांना धोका निर्माण झालाय. अनेक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. प्रशासनाकडून सर्व परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, गावांना पुराचा वेढा
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सावित्री, आंबा, कुडंलिका नदीने पहाटेच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. महाड आणि नागोठणे शहरातील सखल भागात बाजारपेठेत गुडगाभर पाणी साचलं होतं. रोहा तालुक्यातील रोठ आणि वरोसे गावाला पाण्याने वेढा दिलाय. ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने सोलनपाडा गाव रात्रीच स्थलांतरीत करण्यात आलंय. कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील बिरदोले गावाला पाण्याने वेढा दिला असून येथील उल्हास नदी किनारी अनेक गावांमध्ये पाणी साचलं आहे.
कुडंलिका नदीने सकाळीच धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नागोठणे-रोहा मार्गावरील पुलावरुन पाणी जाऊ लागल्याने मार्ग बंद करण्यात आला. ठिकठिकाणी पोलीस नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.
रस्ते पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम
माणगाव ते श्रीवर्धन रोडवरील मोर्बापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद होऊन जनजिवन विस्कळीत झालं. खोपोली-पाली-वाकण मार्ग बंद करावा लागला. आंबा नदीला पूर आल्यामुळे अनेक महत्त्वाचे पूल पाण्याखाली गेले.
पोलादपुर तालुक्यातील अनेक गावांचा सपंर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणात भातशेतीचे बंदीस्त बांध तुटल्यामुळे लावणीसाठी आणलेली रोपे वाहुन गेली आहेत. शेतामध्ये पाणी साचल्याने शेतीची कामे आता कित्येक दिवस खोळंबणार म्हणून शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पाणी साचल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला. शिवाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धीम्या गतीने वाहतूक सुरु आहे.
रेल्वे वाहतुकीवरही परिणाम
कोकण रेल्वे मार्गही काही काळ बंद ठेवण्यात आला होता. दुपारी 2 वाजेनतंर माणगावहून रत्नागिरीकडे पहिली रेल्वे सोडून धीम्या गतीने या मार्गावर वाहतूक सुरु करण्यात आली. मुबंई-पुणे जुन्या मार्गावरुन एक्सप्रेस वेकडे जाणाऱ्या जोडरस्त्यावरील सावरोली पुलावरुन पाणी वाहून लागल्याने या ठिकाणी खालापूर पोलीस तैनात करण्यात आले. माणगाव ते कळंब या रस्तावरील पुलाला धोका निर्माण झाल्याने याही मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
खोपोली ते कर्जत या मार्गावरुन शुक्रवारी रात्रीपासूनच रेल्वे सेवा ठप्प आहे. तर कर्जत-मुबंई मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अनिश्चित काळासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.