गुजरातमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक, चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक : सामना

| Updated on: Jul 02, 2020 | 8:21 AM

चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे (Saamna editorial on Chinese app ban).

गुजरातमध्ये चीनची सर्वाधिक गुंतवणूक, चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक : सामना
Follow us on

मुंबई : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनच्या 59 अ‍ॅपवर बंदी घातली आहे (Saamna editorial on Chinese app ban). सरकारने चीनवर ‘डिजिटल स्ट्राइक’ केला. मात्र, गुजरात राज्यात चीनची सर्वाधिक गुंतवणूक आहे. तिथे 5G’ नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला मिळाले आहे. चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल चाव्या देणे घातक आहे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे (Saamna editorial on Chinese app ban).

“चिनी कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये?”, असा सवाल अग्रलेखात उपस्थित केला आहे.

“चिनी अ‍ॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच तर मग इतकी वर्षे हे सर्व अ‍ॅप्स आणि त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरु होते? म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले, असा आरोप विरोधकांनी केला तर त्यावर सरकारची भूमिका काय असेल?”, असे प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारण्यात आले आहेत.

हेही वाचा : 1 महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा करा, प्रियंका गांधींना केंद्र सरकारची नोटीस

“सरकारने जो ‘डिजिटल स्ट्राइक’ चीनवर केलाय त्यात 59 ऍप्सची नावे आहेत. भारत सरकारने ‘ऑनलाइन’ कंपन्या बंद केल्यामुळे चीनने नाराजी व्यक्त केली आहे, पण फक्त नाराजी व्यक्त करुन काय फायदा? गलवान खोर्‍यात आजही चिनी सैन्य आहे. ते मागे हटायला तयार नाही. कोणी किती मागे हटायचे यावर दोन्ही देशांच्या सैन्य कमांडरांमध्ये चर्चा सुरु आहे. त्याच वेळी चीनच्या 59 ऍपवर मोदी सरकारने बंदीहुकूम बजावला”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“चिनी अ‍ॅप्समार्फत देशाची माहिती बाहेर जात असल्याचं खरं असेल तर इतकी वर्षे हे ‘अ‍ॅप’ चालू देणार्‍या सर्वच सरकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करावे लागेल”, असंदेखील ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“टिकटॉकसारखे चिनी अ‍ॅप अश्लीलता आणि इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते. त्यातून म्हणे अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार हा प्रश्नच आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.