70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर ‘भारत’ रिलीज होणार

| Updated on: Jun 04, 2019 | 9:59 PM

ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना भारत चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर उद्या हा चित्रपट जगभरातील एकूण 5300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

70 देशातील 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर भारत रिलीज होणार
Follow us on

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजे उद्या 5 जून रोजी भारतासह जगभरात प्रदर्शित होणार आहे. सलमान या चित्रपटात वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. भारत चित्रपटात पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना भारत चित्रपटाबाबत उत्सुकता लागली होती. अखेर उद्या हा चित्रपट जगभरातील एकूण 5300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे.

UAE आणि गल्फ देशात बॉलिवूड चित्रपटाचे प्रदर्शन

UAE आणि गल्फ देशात 121 ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. बॉलिवूडमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रदर्शन असल्याचे म्हटले जात आहे. या देशात सलमान खानचे सर्वाधिक चाहते आहेत. यामुळे चित्रपटाला मोठा फायदा मिळू शकतो.

ऑस्ट्रेलियामध्ये 75 पेक्षा अधिक ठिकाणी चित्रपटाचे प्रदर्शन

सलमानचा चित्रपट भारतासह ऑस्ट्रेलियामध्ये 75 पेक्षा अधिक ठिकाणी प्रदर्शित केला जाणार आहे. सलमान आणि कटरीना कैफ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच हा चित्रपट मोठी कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे चित्रपट भारतातील 4 हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे.

सौदी अरब आणि भारतात एकाच दिवशी प्रदर्शित

सऊदी अरब आणि भारतात जर कोणता चित्रपट प्रदर्शित होत असेल, तर त्याची प्रदर्शनाची तारीख एकच नसते. सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाईट सौदीमध्ये एक दिवसआधी प्रदर्शित केला होता. मात्र यंदा पहिल्यांदाच सलमान खानचा पहिला चित्रपट भारतात आणि सऊदी अरबमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

70 देशात चित्रपट प्रदर्शित होणार

सुपरस्टार सलमान खानचा भारत चित्रपट 70 देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. भारतात 4000 पेक्षा अधिक स्क्रीन आणि इतर देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. एकूण चित्रपट 5300 पेक्षा अधिक स्क्रिन्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.

2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.