पूरग्रस्त भागात 30 हजार रुपये प्रति जनावर, गोठ्यासाठी 2100 रुपये मिळणार

| Updated on: Aug 31, 2019 | 5:22 PM

या जनावराच्या प्रत्येक मालकाला दुभत्या जनावरासाठी 30 हजार रुपये प्रति पशुधन या प्रमाणे मदत (Sangli Kolhapur flood help) दिली जाणार आहे. तर गोठ्यासाठीही 2100 रुपये दिले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पूरग्रस्त भागात 30 हजार रुपये प्रति जनावर, गोठ्यासाठी 2100 रुपये मिळणार
Follow us on

मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काहींची घरं वाहून गेली, शेती उद्ध्वस्त झाली, तर काहींनी माणसंही गमावली. पण अनेकांची पोटच्या लेकरासारखी जपलेली जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली. या जनावराच्या प्रत्येक मालकाला दुभत्या जनावरासाठी 30 हजार रुपये प्रति पशुधन या प्रमाणे मदत (Sangli Kolhapur flood help) दिली जाणार आहे. तर गोठ्यासाठीही 2100 रुपये (Sangli Kolhapur flood help) दिले जातील, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, ग्राम पातळीवरील सहकारी दूध संघाचे संचालक आणि संबंधित पशुधनाचे मालक यांनी स्वाक्षरी केलेला घटनास्थळाचा पंचनामा मदतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल. शिवाय गोठा घराला जोडून असला किंवा शेतात असला तरीही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार 2100 रुपये प्रती गोठा मदत देण्यात येईल.

शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीची घोषणा केली होती. एक हेक्टरपर्यंत कृषी कर्ज माफ, बाधित कुटुंबांना तीन महीने गहू आणि तांदूळ मोफत वाटप करण्यात येत आहे. पडझड झालेल्या घरांचं बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून, शिवाय राज्य सरकारकडून अतिरिक्त एक लाख रुपये दिले जाणार आहेत. घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्यात येतील. कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्यात आली आहे.

पूरग्रस्तांना घर बांधून देण्यासाठी काही सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलाय. सामाजिक संस्थांची आर्थिक आणि कामाची कुवत विचारात घेऊन त्यांना कोणते गाव दत्तक देता येईल याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे संयुक्तपणे निर्णय घेतील. या कार्यक्रमातंर्गत घर बांधणीसाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास भूसंपादन करून जागा उपलब्ध करून दिली जाईल. पायाभूत सुविधांमध्ये विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते या सुविधा जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमित योजनेमधून निर्माण करून देण्यात येतील.

छोटे गॅरेज, छोटे व्यावसायिक, हस्तकला, हातमाग कारागिर, बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

कुटुंब निश्चित करण्यासाठी केवळ शिधापत्रिकेचा आधार न धरता दोन वेगवेगळी घरे, दोन वेगवेगळी वीज देयके, दोन गॅस कनेक्शन किंवा इतर असा पुरावा जो कुटुंब स्वतंत्र असल्याचे सिद्ध होत असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती सुभाष देशमुखांनी दिली.