बंगळुरु हायवेवर 16 ते 18 हजार वाहनं अडकून, चालकांच्या खाण्याचे हाल

| Updated on: Aug 09, 2019 | 5:34 PM

पाणी शिरल्यामुळे (Sangli Kolhapur Flood) शिरवळ, आनेवाडी, कराड येथे अवजड वाहनांची रांग लागली आहे. साताऱ्यातही पाच हजारांहून अधिक वाहने हायवेला थांबली आहेत. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु हायवेवर 16-18 हजार वाहनं थांबून आहेत.

बंगळुरु हायवेवर 16 ते 18 हजार वाहनं अडकून, चालकांच्या खाण्याचे हाल
Follow us on

पुणे : गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Sangli Kolhapur Flood) पुणे-बंगळुरु महामार्गही ठप्प आहे. कोल्हापूरला महापुराचा (Sangli Kolhapur Flood) वेढा पडल्याने तेथील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तसेच कराडमध्येही पाणी शिरल्यामुळे (Sangli Kolhapur Flood) शिरवळ, आनेवाडी, कराड येथे अवजड वाहनांची रांग लागली आहे. साताऱ्यातही पाच हजारांहून अधिक वाहने हायवेला थांबली आहेत. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगळुरु हायवेवर 16-18 हजार वाहनं थांबून आहेत.

पुण्यात पत्रकार परिषदेत दीपक म्हैसेकर रस्ता सुरु होताच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिलं जाणार आहे. इतर वाहनांना नंतर प्रवेश दिला जाईल, असं विभागीय आयुक्तांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गावर थांबलेल्या ट्रक चालकांना जेवण, पाणी आणि नाष्टा ही व्यवस्था सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि सातारा आरटीओ यांनी केली आहे.

सांगलीत अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्न

सांगली जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी 76 बोटी उपलब्ध आहेत. यामध्ये एनडीआरएफ पथकाकडील 42, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका पथकाकडील 2, सोलापूरकडून 12, कोस्टल गार्डकडील 1, महाबळेश्वरकडील 6, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना वाळवा यांच्याकडील 1, ग्रामपंचायत 2 आणि आर्मीच्या 6 यांचा समावेश असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली.

सांगलीवाडी परिसरात जवळपास 3 हजार अन्न पाकिटे हेलिकॉप्टर आणि बोटीव्दारे पोहोचविण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास 5 हजार अन्न पाकिटे आणि पाण्याच्या बॉटल्स बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविण्यात येत आहेत. 57.4 फूट असलेली पाणीपातळी स्थिर होत असून कमीही होत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

सांगली जिल्ह्यात आपत्कालील स्थितीत मदत हवी असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा – 9370333932, 8208689681

विभागीय आयुक्तांनी दिलेली माहिती

कालच्या तुलनेत आज धरणक्षेत्रात अतिवृष्टी नाही, फक्त महाबळेश्वरला जास्त पाऊस नोंदवण्यात आला.

गुरुवारी दोन लाख स्थलांतरित होते, यात 85 हजार लोकांची भर पडली असून सध्या विभागात 2 लाख 85 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.

आतापर्यंत एकूण 29 मृत्यू झाले आहेत, यापैकी 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

सांगलीत प्रथम हेलिकॉप्टरमधून धान्य दिलं जातंय, फूड पाकीट दिले आहेत, तर अजून रेस्क्यू कोणाला केलं नाही, आतापर्यंत तीन खेपा झाल्या. मात्र आता वातावरण खराब झालं आहे.

अलमट्टी धरणातून कर्नाटक सरकारने आज दुपारपर्यंत 4,50,000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

पाण्याच्या 30 हजार बॉटल दिल्या आहेत, काही टँकरही सुरु करण्यात आले आहेत. मदतीसाठी कक्ष उभारला आहे. मेणबत्त्या, ब्लँकेट, सतरंजी अशी मदत दिली जात आहे. ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी फक्त नवीन कपडे आणावेत, जुने कपडे आणू नये. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करता येईल. त्यात कर सवलत मिळणार आहे.

महावितरणने 77 हजार ग्राहकांचा पुरवठा पुन्हा सुरळीत केला, पाणीपुरवठा योजना वीज पुरवठा सुरू करण्यावर भर आहे.

पुणे बंगळुरु महामार्गावर अजून 16 ते 18 हजार अवजड वाहनं अडकून आहेत. रस्ता सुरळीत होताच जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिलं जाईल.

सांगलीत अजून 28 गावांचा संपर्क तुटलेला आहे, तर कोल्हापूरला अजून 18 गावांचा संपर्क तुटला आहे. तिथे बोटीने मदत कार्य सुरु आहे.

इमेज सॅटेलाईटच्या माध्यमातून शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतला जातोय. पूरग्रस्तांना सरकारने 76 कोटींची मदत करण्याचं ठरवलंय. वैद्यकीय पथकही उपलब्ध आहेत. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी मशिन उपलब्ध केल्या जात आहेत.

बसची वाहतूक फक्त सांगली डेपोकडून बंद होती, पण ती त्यांनी सुरु केली आहे.

शैक्षणिक साहित्य बदलून दिलं जाईल, नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळेल.

अलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाच लाख क्युसेकने विसर्ग करण्याची मागणी आहे, मला वाचवा असे फोन येतात, आम्ही सर्व संपर्कात आहोत, आतापर्यंत सर्व गावात संपर्क साधला आहे.

पाणी शनिवारी संध्याकाळपर्यंत कमी होईल. पण साधारण परिस्थिती होण्यासाठी वेळ लागणार आहे.

नैसर्गिक मृत्यू आणि किती जणांवर अंत्यसंस्कार झालेत, या संदर्भात आकडेवारी उपलब्ध नाही

शहरात 15 हजार, तर ग्रामीण भागात 10 हजार या प्रमाणे प्रति कुटुंब मदत करण्यात येईल.

पूर ओसरल्यानंतर आरोग्यवर भर देण्यात येणार आहे.

मोठ्या प्रमाणात नागरिक अडकले, त्यामुळे 100 बोटी गेल्या तरी मर्यादा येतात. रेडी टू इट फूड पाकीट देतोय, सर्वांच्या समाधान एवढं देणं अशक्य आहे. पण प्रयत्न सुरु आहेत.

“मदत पुरवण्यासाठई युद्धपातळीवर प्रयत्न”

पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाने 154 कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यातून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रति कुटुंब 10 हजार तर शहरी भागातील प्रति कुटुंब 15 हजार रुपये मदत करण्यात येणार आहे. ही मदत तातडीने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 239 गावे आणि सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 90 गावे अशी 12 तालुक्यातील 329 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.

पुरामुळे बाधित गावातील दोन लाख 52 हजार जणांना बचाव पथकांनी सुरक्षितस्थळी हलविले असून विविध 270 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशीही माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.