अक्षयला भीती होती तेच झालं, शाहू कॉलेजच्या पहिल्या यादीत नाव नाही

| Updated on: Jun 24, 2019 | 7:32 PM

पहिली यादी 95.20 टक्क्यांवर क्लोज झाली आहे. दुसऱ्या यादीत अक्षयचा हमखास समावेश असेल असं सांगितलं जातंय. 94 टक्के मिळवूनही कॉलेज प्रवेशाची धाकधूक मनात असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अक्षय देवकरने आत्महत्या केली होती.

अक्षयला भीती होती तेच झालं, शाहू कॉलेजच्या पहिल्या यादीत नाव नाही
Follow us on

लातूर : मराठवाड्यातील शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या लातूरमधील राजर्षी शाहू कॉलेजची पहिली यादी लागली आहे. प्रवेश मिळणार नाही या भीतीने आत्महत्या केलेल्या अक्षय देवकरचाही या यादीत समावेश नाही. कारण, पहिली यादी 95.20 टक्क्यांवर क्लोज झाली आहे. दुसऱ्या यादीत अक्षयचा हमखास समावेश असेल असं सांगितलं जातंय. 94 टक्के मिळवूनही कॉलेज प्रवेशाची धाकधूक मनात असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अक्षय देवकरने आत्महत्या केली होती.

विशेष म्हणजे विनाअनुदानित तुकडीसाठी अक्षयचा प्रवेश निश्चित झालाय. कारण ही यादी 93.60 टक्क्यांवर क्लोज झाली आहे आणि अक्षयला 94.20 टक्के आहेत. यावरून अक्षयला लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश निश्चित मिळाला असता. मात्र, त्याने गैरसमजूत आणि भीतीने दुर्दैवी निर्णय घेतला असं म्हणावे लागेल. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारने सर्वच महाविद्यालयांना आरक्षणाप्रमाणे प्रवेश देण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. पण असंख्य विद्यार्थ्यांकडे जातीचं प्रमाणपत्र नसल्याने अडचण होत आहे. तहसीलमध्ये जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाच्या पावतीवरही प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उस्मानाबादच्या देवळाली गावातील मराठा समाजातला तरुण अक्षय शहाजी देवकर यानं आत्महत्या केली. नुकत्याच झालेल्या दहावीच्या परिक्षेत त्याला 94% गुण मिळून सुध्दा चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. अक्षयला गणितात 99 मार्क्स होते. त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं. मात्र दुष्काळ, घरची गरीबी आणि आरक्षण मिळत नसल्यानं प्रवेशात निर्माण झालेल्या अडचणी या तणावातून त्यानं आत्महत्या केली.

संभाजीराजेंचा संताप

देवळाली येथील आत्महत्याच्या घटनेनंतर “आरक्षण गेलं खड्ड्यात!, पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत करा,” असा संताप खासदार संभाजीराजेंनी व्यक्त केला होता. “गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न. त्यातच आरक्षणाअभावी मराठा विद्यार्थ्यानं केलेल्या आत्महत्येनंतर खासदार, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. आरक्षण गेलं खड्ड्यात ! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा,” अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरवरून केली. ‘मी मनापासून थक्क झालो आहे, माझ्याकडे बोलण्यासारखे शब्दच नाहीत, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले होते.

VIDEO :