नाशिक : उन्हाळी कांद्यापाठोपाठ लाल कांद्याच्या (lasalgaon Onion rate) बाजार भावालाही लाली चढली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या (lasalgaon Onion rate) बाजार भावाने आठ हजाराचा टप्पा पार करत ऐतिहासिक असा 8152 रुपये इतका उच्चांकी बाजारभाव जाहीर झाला. तर दुसरीकडे देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने, केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून 17 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा कांदा डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीस देशांतर्गत दाखल होणार असल्याने, त्यादरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आवक होणार असून, दोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील आणि याचा फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसण्याची भीती या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
लासलगाव बाजार समितीत शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी लाल कांद्याच्या बाजार भावात बाराशे रुपयांची प्रति क्विंटल मागे वाढ झाली. उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात आल्याने लाल कांद्याच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे दिसून आले. लासलगाव बाजार समितीत जास्तीत जास्त 8152 रुपये, तर सरासरी 7100 रुपये तर कमीतकमी 2000 रुपये प्रतिक्विंटला बाजार भाव मिळाल्याने, लासलगाव बाजार समितीत 2015 मधील लाल कांद्याला उच्चांकी असा 6300 रुपये बाजार भावाचा विक्रम मोडीत काढत, 8152 रुपये इतक्या उच्चांकी बाजार भावाची आज ऐतिहासिक नोंद झाली.
परतीचा पाऊस जास्त दिवस लांबल्याने तसेच त्यात क्यार चक्रीवादळामुळे लाल कांद्याच्या पिकाचे राज्यासह दक्षिणेकडील आंध्रप्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले. त्यामुळे लाल कांद्याची आवक मंदावली होती. अल्प प्रमाणात राहिलेल्या उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात येत असल्यामुळेच, होलसेल कांद्याच्या बाजार भावात वाढ होत आहे. दिल्ली-मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कांद्याच्या बाजार भावाने प्रत्येक किलोला शंभरी पार केल्याने शहरी भागातील हॉटेलमधून मिळणाऱ्या सलाडमधून कांदा हा हद्दपार झाला आहे. तर गृहिणींचे बजेट बिघडल्याने केंद्र सरकारने मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा देशांतर्गत होत नसल्याने कांदा इजिप्त- तुर्की या देशातून 17 हजार मेट्रिक टन इतका कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा कांदा डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी दाखल होणार आहे. मात्र यादरम्यान देशांतर्गत लाल कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात दाखल होणार असल्याने, कांद्याचे बाजार भाव कोसळतील आणि याचा थेट फटका हा भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची भीती या क्षेत्रातील कांदा तज्ञांनी व्यक्त केली आहे.
उन्हाळ कांद्याला चांगला बाजारभाव असल्याने, लाल कांद्यातूनही दोन रुपये मिळतील या अपेक्षेने लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले. मात्र परतीचा पाऊस लांबला आणि त्यातच चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले. यातून शिल्लक राहिलेल्या कांद्याला आज चांगला बाजारभाव मिळत आहे. या कांद्याला एकरी 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो आणि शेतकरी कुटुंबाची मजुरी आणि मेहनत यात पकडल्यास हा खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये प्रति एकरी येत असल्याने, केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा घेतलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे मत कांदा उत्पादक करत आहे.