गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मंत्री, पुढे काय? : उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 17, 2020 | 2:57 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी आज गणपतीपुळ्याला भेट दिली (CM Uddhav Thackeray On Kokan tour).

गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मंत्री, पुढे काय? : उद्धव ठाकरे
Follow us on

रत्नागिरी : “गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मुख्यमंत्री? झालात ना तुम्ही मंत्री, पुढे काय? आशीर्वाद मिळवून तुम्हाला पदावरती बसवलं. जनता म्हणजे माझा आशीर्वीद आहे, असं गणपती बाप्पा सांगतोय”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींना गणपतीपुळ्याचा विकास करण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज त्यांनी गणपतीपुळ्याला भेट दिली. यावेळी तेथील लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक नागरिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे उदाहरण दिले (CM Uddhav Thackeray On Kokan tour).

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“गणपती बाप्पा म्हणतो तुला आशीर्वाद दिले, झालास ना तू मुख्यमंत्री? झालात ना तुम्ही मंत्री, पुढे काय? आशीर्वाद मिळवून तुम्हाला पदावरती बसवलं. जनता म्हणजे माझा आशीर्वाद आहे, असं गणपती बाप्पा सांगतोय. पदावर बसवल्यानंतर ज्या एका उद्देशाने जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे ते व्हायला हवं. देव कुठे बघायचा? हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे (CM Uddhav Thackeray On Kokan tour).

मी तर म्हणेन, तो गणपती बाप्पा आहे, त्याचे जिवंत रुप माझ्यासमोर बसलेलं आहे. जनता आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याला इथपर्यंत बसवते. मग त्यांच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचे दोन-चार क्षण आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यासाठी निधीची चिंता करु नका, मी बसलो आहे. आराखडा बनवायला सुरुवात करा. मी तुम्हाला हात मोकळे करुन देतो. चला तुम्ही पुढे चला.

मी आपल्या मुंबईच्या जवळच्या अंबरनाथ मंदिराला पाच ते सात वर्षापूर्वी भेट दिली होती. तिथे गेल्यावर परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. मला खरंच वाईट वाटलं होतं. आपण म्हणतो, ‘गर्व से कहो हिंदू है’ आणि मंदिरात जाताना नाक बांधून जावं लागतं. पण सुदैवाने जसं तुम्ही विनायक राऊत यांना निवडून दिलं तसंच त्याभागात जनतेने गेल्यावेळेस आणि याही वेळेस श्रीकांत शिंदे यांना निवडून दिलं. तरुण पोरगा आहे. त्याला मी फोन करुन सांगितलं की, अरे श्रीकांत तू आता खासदार झाला आहेस. अंबरनाथ मंदिराच्या आसपास जाऊन बघ. तो जाऊन आला आणि मला म्हणाला साहेब काय करायचं ते मी करतो.

काही दिवस निघून गेले आणि एक दिवस अंबरनाथ महोत्सवाचं आमंत्रण घेऊन आला. तिथे गेल्यानंतर माझा विश्वास बसेना की हेच ते ठिकाण जे काही दिवसांपूर्वी अस्वच्छ असल्यामुळे मला त्याठिकाणी जाऊ नये, असं वाटत होतं. त्याभागाचा श्रीकांत शिंदे यांनी कायापालट केला होता.

आता दरवर्षी तिथे अंबरनाथ महोत्सव असतो. सगळे दिग्गज येतात. हजारो, लाखो लोक पूर्वी येतच होती आता ते आनंदाने येतात. त्या महोत्सावाची मजा घेतात. मंदिर परिसरही त्याने स्वच्छ ठेवलेला आहे. असं काहीतरी गणपतीपुळे परिसरातही करुया. येणाऱ्या जाणाऱ्यांसुद्धा आनंद वाटला पाहिजे. मंगलमूर्ती म्हटल्यावर मंदिर परिसरातील वातावरणही मंगल असलं पाहिजे.

शिवसेना आणि कोकणचं घट्ट नातं आहे. कोणतंही संकट कसंही येऊ द्या, कोकणवासीयांनी आशीर्वाद दिला आहे. या आशीर्वादाच्या जोरावर आम्ही महाराष्ट्रात आणि देशात पुढे जात आहोत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.