केंद्राचा अर्थसंकल्प हा दूरदर्शी, त्यात मी नवा भारत पाहतो : मुख्यमंत्री

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नागपूर : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. सेवा क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय हा दूरदर्शी अर्थसंकल्प होता, यातून नवा भारत निर्माण होईल, असंही ते म्हणाले. या सरकाने जी अर्थनीती तयार केली, ती आतापर्यंत दुसरं कोणतंही सरकार करू शकलं नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 2035 […]

केंद्राचा अर्थसंकल्प हा दूरदर्शी, त्यात मी नवा भारत पाहतो : मुख्यमंत्री
Follow us on

नागपूर : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. सेवा क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय हा दूरदर्शी अर्थसंकल्प होता, यातून नवा भारत निर्माण होईल, असंही ते म्हणाले. या सरकाने जी अर्थनीती तयार केली, ती आतापर्यंत दुसरं कोणतंही सरकार करू शकलं नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

2035 पर्यंत देशाला महाशक्ती बनण्याची संधी आहे. मात्र त्यात जर पॅरालिसिसवालं सरकार आलं तर मात्र आपण मागे राहू, त्यामुळे आम्हाला सक्षम सरकारची, निर्णय घेणाऱ्या सरकारची गरज आहे. जे मोदी सरकार करत आहे, आजच्या बजेटची थीम 2030 पर्यंतची होती. साधारणतः बजेटमध्ये एक वर्षाचा विचार केला जातो. मात्र या बजेटमध्ये 2030 चा विचार केला गेला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरात ते मनी बी इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात बोलत होते.

देशाचे पंतप्रधान भविष्यातलाही विचार करतात. त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा पुढचा विचार आहे. या बजेटवर अनेक चर्चा सुरू आहेत. कोणी चांगलं म्हणतंय, कोणी त्यावर टीका करत आहे. मात्र या बजेटने नवीन योजनेला जन्म दिला असून शेतकऱ्यांना मदत दिली गेली आणि सहा हजार वर्षाला दिले जाणार आहेत. लहान शेतकऱ्यांसाठी सहा हजार सुद्धा त्याच्या पेरणीच्या वेळी मोठी मदत ठरतील. राजीव गांधी म्हणाले होते आम्ही केंद्रातून एक रुपया पाठवितो, पण जनतेपर्यंत 10 पैसे पोहोचतात. मात्र या सरकारमध्ये एक रुपया पाठविला तर तो एक रुपयाच पोहचतो. याचं कारण आहे अर्थनीती, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

असंघटित मजुरांसाठी सुद्धा सरकारने योजना आणली आणि प्रत्येक महिन्याला 3 हजार दिले जाणार आहेत. त्याचा फायदा या असंघटित मजुरांना होणार आहे. एक महामंडळ सुद्धा निर्माण केलं जाणार आहे. मध्यम वर्गीयांना आयकरात सूट देण्यात आली, ते डबल करण्यात आल्याने मध्यम वर्गाला फायदा होणार आहे. या सगळ्या बाबी जोडल्या तर दिसून येईल की सरकारची अर्थनीती काय आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

देशातील घराघरात वीज पोहोचवण्याचं उद्दीष्ट सरकारने ठेवलंय. महाराष्ट्रात हे ध्येय पूर्ण झालंय आणि देशातही पूर्ण होत आहे. मोदींनी व्यवस्थाच अशी केली की कोणी टॅक्स चोरी करू शकत नाही, चोरी करणाऱ्यांना भीती वाटली आणि सगळे व्यवहार पक्के व्हायला लागले, त्यातून हा पैसे उभा झाला. 2030 मध्ये भारत आणि चीन या दोनच देशात स्पर्धा राहील इतर कुठेही नसेल. सेवा क्षेत्र सगळ्यात जास्त जॉब तयार करत आहे. त्यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असाही दावा मुख्यमंत्र्यांनी केला.