साप चावला, पुलावरील पाण्याने वाट अडवली, नववीतील मुलीचा मृत्यू

| Updated on: Sep 17, 2019 | 5:49 PM

वर्धा जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आलाय. नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असल्याने उपचारासाठी जाऊ न शकलेल्या मुलीचा (Wardha girl snake bite) उपचाराअभावी सर्पदंशाने मृत्यू झाला.

साप चावला, पुलावरील पाण्याने वाट अडवली, नववीतील मुलीचा मृत्यू
Follow us on

वर्धा : प्रगत देशाचं स्वप्न पाहताना गावखेड्यांतील समस्यांचा डोंगर आजही कायम आहे. एकीकडे मोठमोठे पूल, रस्ते बांधले जात असताना दुसरीकडे नाल्यांवरील पुलाच्या उंची न वाढवल्याने गावांत पावसाळ्यात जीवघेण्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. वर्धा जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आलाय. नाल्याचं पाणी पुलावरून वाहत असल्याने उपचारासाठी जाऊ न शकलेल्या मुलीचा (Wardha girl snake bite) उपचाराअभावी सर्पदंशाने मृत्यू झाला. जयती गेंदलाल सोलंकी (Wardha girl snake bite) (वय 16) असं या मुलीचं नाव आहे.

आर्वी तालुक्यातील सावध (हेटी) इथे राहणारी जयती सोलंकी इयत्ता नववीत शिकत होती. जयतीला रात्रीच्या वेळी सर्पदंश झाला. हे लक्षात येताच कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी दवाखान्याकडे धाव घेतली. पण नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी होतं. पाण्यातून वाट काढता न आल्याने जयतीचा नाल्याच्या काठावरच मृत्यू झाला आणि तिचा मृतदेहच घरी न्यावा लागला. या घटनेमुळे सोलंकी परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सावध हेटी या वस्तीतील रहिवाशांनी आवागमन करण्यास नाला पार करावा लागतो. मागणी करूनही या नाल्यावर अद्याप उंच पूल झालेला नाही. इथले जवळपास 25 विद्यार्थी शाळेत जातात. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यानंतर एक तर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच थांबावं लागतं किंवा गावात असल्यास गावांतच राहावं लागतं.

मुलं घरी परत येईपर्यंत आई-वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही होतं. मागील 20 वर्षांपासून या यातना हे गावकरी सहन करत आहेत. नाल्याच्या वरच्या दिशेला दहेगाव धरण आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर महिन्यांपर्यंत पुलावरून पाणी वाहत राहतं. बरेचदा धोका पत्करूनही गावकरी येजा करतात. गावकऱ्यांची गरज लवकरच प्रशासनाच्या लक्षात येवो हीच अपेक्षा आहे.