मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार घातला जातोय. तर केंद्र सरकारनेही पाकिस्तानमधून होणारी आयात जवळपास अशक्य केली आहे. कारण पाकिस्तानच्या वस्तूंवर तब्बल 200 टक्के कर लावलाय. पण भारतातून अदानी समुहाची वीज पाकिस्तानला जात असल्याचा आरोप केला जातोय. हा मेसेज खोटा असून आम्ही पाकिस्तानला वीज पुरवत नसल्याचं स्पष्टीकरण अदानी समुहाने दिलंय.
पाकिस्तानच्या वस्तूंवर तर बंदी घालाल, पण भारतातून पाकिस्तानला अदानी समुहाची वीज जाते त्याचं काय? असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होता. एवढंच नव्हे, तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही ही वीज बंद करण्याची मागणी केली होती. पण आम्ही कोणत्याही प्रकारचा वीजपुरवठा पाकिस्तानला करत नसल्याचं स्पष्टीकरण देत अशी माहिती न पसरवण्याचं आवाहनही अदानी समुहाने केलंय. यानंतर मनीष सिसोदिया यांनी त्यांचं ट्वीटही डिलीट केलं.
The Adani Group would like to inform you that we do not supply electricity to Pakistan. You must withdraw such incorrect and irresponsible statements.
— Adani Group (@AdaniOnline) February 16, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष आहे. भारत सरकारनेही पाकिस्तानी वस्तू भारतात येऊ नये यासाठी तब्बल 200 टक्के इम्पोर्ट ड्युटी लावली आहे. शिवाय पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जाही काढून घेण्यात आलाय. पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकटं पाडण्याच्या दृष्टीनेही परराष्ट्र मंत्रालय कामाला लागलंय.
या परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर पाकिस्तानविरोधात अनेक मेसेज फिरत आहेत. त्यात अदानी समुहाविषयीचाही मेसेज होता. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, अदानी समुहाने पाकिस्तानला वीज पुरवठा करण्यासाठी 2014 मध्ये भेटही दिली होती. पण पाकिस्तानमधील तेव्हाचं सरकारही सध्या बदललं आणि या प्रस्तावामध्ये पुढे काहीही झालेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजचं अदानी समुहाकडून खंडन करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ