शेतकऱ्यांसाठी 500 रुपये काय असतात ते एसीत बसणारांना समजणार नाही : पियुष गोयल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. वर्षातून तीन वेळा दोन-दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळतील. विशेष म्हणजे 1 डिसेंबर 2018 पासूनचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल आणि 1 मार्च 2019 पासूनच या योजनेची अंमलबजावणी होईल. शेतकऱ्यांना अल्पसा दिलासा देण्यासाठी ही योजना आणली असल्याचं अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री पियुष गोयल […]

शेतकऱ्यांसाठी 500 रुपये काय असतात ते एसीत बसणारांना समजणार नाही : पियुष गोयल
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. वर्षातून तीन वेळा दोन-दोन हजार असे एकूण सहा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळतील. विशेष म्हणजे 1 डिसेंबर 2018 पासूनचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल आणि 1 मार्च 2019 पासूनच या योजनेची अंमलबजावणी होईल. शेतकऱ्यांना अल्पसा दिलासा देण्यासाठी ही योजना आणली असल्याचं अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री पियुष गोयल म्हणाले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत पियुष गोयल यांनी या योजनेचं महत्त्व समजावून सांगितलं. शेतकऱ्यांना महिन्याला फक्त पाचशे रुपयात काय होईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. शेतकऱ्यांसाठी 500 रुपयेही किती महत्त्वाचे असतात ते एसी रुममध्ये बसतात त्यांना कळणार नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

नैसर्गिक संकट आल्यानंतर शेतकऱ्यांकडे खर्चासाठी अक्षरशः एक रुपयाही नसतो. अशा वेळी शेतकरी हे पैसे विविध कामांसाठी वापरु शकतो. कुणाला दवाखान्यात जाण्यासाठी पैसे कामी येतील, कुणाला पिकासाठी कीटकनाशक आणण्यासाठी पैसे कामी येतील. हे कोणतं अनुदान नाही. आपल्या अन्नदात्याचा सन्मान म्हणून ही योजना आहे, असं पियुष गोयल म्हणाले.

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी नेहमीच दिलासादायक योजना आणल्या आहेत, असं गोयल म्हणाले. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यासाठी 75 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेचा फायदा देशातील 12 कोटी कुटुंबांना होईल, अशी माहिती गोयल यांनी दिली. एकाच वेळी सहा हजार रुपये दिले जाणार नसले तरी ती शाश्वत तरतूद असल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं.

कर्जमाफीचा लाभ हा सर्वच शेतकऱ्यांना होत नाही. एका ठराविक गटाला कर्जमाफीचा फायदा होतो. त्यामुळे ही थेट मदत देणं हा शाश्वत पर्याय असल्याचं गोयल म्हणाले. वर्षातील तीनही हंगामात चांगलं पीक यावं यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. देशात अजूनही चांगली सिंचन सुविधा नाही. त्यामुळे हेच सध्या ध्येय असल्याचं ते म्हणाले.