MPSC चे गुणवंत | झोपडीत दिव्याखाली अभ्यास, भंगार विक्रेत्याचा मुलगा नायब तहसीलदार, अक्षयच्या चिकाटीसमोर दारिद्र्यही झुकलं

| Updated on: Jun 21, 2020 | 7:15 PM

अक्षयची घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने प्रचंड अभ्यास करत यशाचा डोंगर उभा केला (Amravati MPSC Scholar Akshay Gadling Success Story).

MPSC चे गुणवंत | झोपडीत दिव्याखाली अभ्यास, भंगार विक्रेत्याचा मुलगा नायब तहसीलदार, अक्षयच्या चिकाटीसमोर दारिद्र्यही झुकलं
Follow us on

अमरावती : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अमरावतीच्या तिवसा येथील अक्षय बाबाराव गडलिंग हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला (Amravati MPSC Scholar Akshay Gadling Success Story). अक्षयची घरची परिस्थिती बेताची, कुटुंबाचे हातावर पोट असताना त्याने प्रचंड अभ्यास करत यशाचा डोंगर उभा केला.

अक्षय तिवसा येथील आपल्या झोपडीत दिवा लावून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. मात्र, त्याने आपल्या गरीबीचं कधीही भांडवल केलं नाही. त्याच्या जिद्द आणि चकाटीसमोर आज दारिद्र्यलाही झुकावं लागलं. विशेष म्हणजे अक्षयने स्पर्धा परीक्षेचा कुठलाही क्लास न लावता फक्त वचनालयतून अभ्यास करत विजयाला गवसणी घातली (Amravati MPSC Scholar Akshay Gadling Success Story).

हेही वाचा : MPSC Result 2019 | राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सातारचा पठ्ठ्या अव्वल

अक्षयने शाळेच्या वाद-विवाद स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आणि इतर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे पारितोषिकंसुद्धा पटकावले आहेत. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्याने याआधी पीएसआय वन विभागाची परीक्षादेखील पास केली होती. मात्र, काही कारणास्तव तो जाऊ शकला नाही. तरीही तो खचला नाही. त्याने अभ्यास सतत चालू ठेवला.

अक्षय हा लहानपणापासूनच हुशार आहे. त्याने वादविवाद स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवली. त्याची वेगळे काहीतरी करण्याची जिद्द होती. त्यामुळे त्याने अधिकारी होण्याचं ठरवलं. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय खचला नाही. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.

हेही वाचा : MPSC चे गुणवंत | कळंब ते दिल्ली व्हाया मुंबई, निवृत्त कंडक्टरचा मुलगा रवींद्र शेळके मागासवर्गातून प्रथम

अक्षयचे वडील बाबाराव गडलिंग यांचा गेल्या 40 वर्षांपासून भंगार आणि रांगोळी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गरिबीची चणचण अक्षयला भासू नये यासाठी वडिलांनी अक्षयला अभ्यासासाठी कुठलीच कमतरता होऊ दिली नाही. ध्येयवेड्या अक्षयने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बळगलं, हे स्वप्न त्याने वयाच्या 25 वर्षी सत्यात उतरवलं आहे. अखेर अक्षय आज नायब तहसीलदार झाला!