औरंगाबाद: जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या 706 अंगणवाड्या (Anganwadi) स्वतःच्या इमारतीत चालवल्या जात नसल्याचे उघड झाले आहे. सहा वर्षाखालील बालकांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या शाळांना सरकारी इमारतच अद्याप मिळालेली नाही. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) या अंगणवाड्या समाजमंदिर, प्राथमिक शाळा, मंदिराच्या ओट्यावर, वसतीशाळा आणि किरायाच्या खोल्यांमध्ये भरवल्या जातात.
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 3,509 अंगणवाड्या सध्याच्या घडीला कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष या वयाची 1 लाख 45 हजार आणि 3 ते 6 वर्ष वयाची 1 लाख 10 हजार बालके सध्या शिक्षण घेत आहेत. सध्या जिल्ह्यातील एकूण 2 हजार 750 अंगणवाड्या स्वतःच्या इमारतीत भरवल्या जातात. तर 705 अंगणवाड्यांना हक्काचे छत नाही. त्यामुळे या अंगणवाड्या मिळेल त्या जागेत चालवल्या जात आहेत. अशा अंगणवाड्यांना हक्काची जागा देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीकडून अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून अंगणवाड्यांसाठीच्या इमारती बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. एका अंगणवाडीसाठी 8 लाख 50 हजार रुपये तर डोंगरी भागातील अंगणवाडीसाठी 9 लाख 35 हजार रुपये निधी दिला जातो. सध्या सरकारकडून प्राप्त झालेल्या निधीतून 110 अंगणवाड्या बांधण्याचे नियोजन आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे अंगणवाड्यांची पडझड झाली आहे. त्या अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचे कामही आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांची 2 हजार 704 पदांपैकी 228 पदे रिक्त आहेत. यापैकी 98 सेविका, 130 मिनी अंगणवाडी सेविका आणि 300 अंगणवाडी मदतनीसांची पदे रिक्त आहेत. यातील 19 अंगणवाडी सेविका, 47 मदतनीस आणि 130 मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया प्रशासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना सुपरवायझरपदी बढती देण्यात आल्याची माहिती प्रसाद मिरकले यांनी दिली आहे.
शालेय पोषण आहाराच्या नावीन्यपूर्ण उपक्रम योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता न्यूट्रिटिव्ह स्लाइस हेल्दी आहार देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी व सोयाबीनचे मुख्य घटक असलेला सकस आहार आठवड्यातून पाच दिवस विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना शिक्षण विभागाचे संचालक ( प्राथमिक) दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहार पात्र असलेल्या जिल्हा परिषद, मनपा, नगरपालिका, शासकीय व कटक मंडळ शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली आहे. त्यानुसार तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यासह लोहयुक्त गव्हाचे पीठ, पिठी साखर, बनवण्यात आली आहे.
इतर बातम्या-
अहो दसरा आलाय…जावयासाठी खऱ्या सोन्याची पानंही आलीत अन् सोनेही स्वस्त.. वाचा औरंगाबादचे भाव
तिरुपतीचे बनावट पास देणाऱ्या भामट्याला बेड्या, 61भाविक दर्शनाविनाच परतले होते औरंगाबादेत