Aurangabad | कष्टकरी, सामान्य व शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे, औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही!

| Updated on: May 01, 2022 | 2:57 PM

जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले,' विकासाच्या प्रकियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पहिल्या डोसचे प्रमाण 83 टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण 61.80 टक्के एवढे आहे.

Aurangabad | कष्टकरी, सामान्य व शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे, औरंगाबादेत पालकमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

औरंगाबादः महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) औरंगाबादमधील पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी जनतेला उद्देशून शुभेच्छा दिल्या. तसेच कष्टकरी, सामान्य आणि शेतकऱ्यांच्या (Farmers) पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही दिली.  कोविड परिस्थि ती, मिशन वात्स्ल्य, ऑरिकमधील सुविधा, उभारी 2.0 उपक्रम, संतपीठाची सुरूवात, पर्यटन विकास, संत ज्ञानेश्वर उद्यानाचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळा, संत एकनाथ रंग मंदिर नूतनीकरण आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेले राज्यस्तरीय चित्र प्रदर्शन आदी जिल्ह्यातील कामांचे कौतुक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. या कार्यक्रमास आमदार अंबादार दानवे, आमदार अतुल सावे, चंद्रकांत खैरे, नंदकुमार घोडेले, रशीद मामू आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम.प्रसन्ना, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया आदींची उपस्थिती होती.

काय म्हणाले पालकमंत्री?

यावेळी जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले,’ विकासाच्या प्रकियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात पहिल्या डोसचे प्रमाण 83 टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण 61.80 टक्के एवढे आहे. कोविडमध्ये पालक गमावलेल्या मुलांना तसेच विधवा महिलांना ‘मिशन वात्सल्य’च्या माध्यमातून लाभ दिला जातो. दोन्ही पालक गमावलेल्या 27 मुलांना 5 लाख रुपयांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून मदत करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात ‘शिवभोजन’ अंतर्गत 26 लाखांना लाभ

‘शिवभोजन’ ही महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना 2020 पासून सुरू आहे. जिल्ह्यातील 57 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 26 लाख 12 हजार 826 गरजूंनी शिवभेाजनाचा लाभ घेतला आहे. ऑरिक सिटी ही एक जागतिक दर्जाची औद्योगिक वसाहत असून ऑरीकमध्ये आजपर्यंत 150 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात असून पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ऑरिक सिटीत विविध सुविधा उपलब्ध असल्याने विदेशी गुंतवणुकीसाठी औरंगाबादला प्राधान्य देण्यात येत आहे,अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील योजनांची स्थिती काय?

रोजगार हमी योजनेमध्ये जिल्ह्याने 252 टक्के उद्दिष्ट साध्य करीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत देशात महाराष्ट्र तर राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. या योजनेअंतर्गत 107 अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘उभारी 2.0’ या अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कुटुंबनिहाय गरजांचे वस्तूनिष्ठ विश्लेषण आणि उपाययोजनांचा आराखडा बनविण्यात येत आहे. खुलताबाद आणि कन्नड येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुबियांना विविध उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘विकेल ते पिकेल’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मराठवाड्यात केसर आंब्याला बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उत्पादक ते ग्राहक’ या योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने महापालिका हद्दीत 12 ठिकाणी आंबा विक्रीकरिता जागा दिली आहे. याकरिता जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

वारसा स्थळांचे सुशोभिकरण

पैठण येथे संत एकनाथ महाराज संतपीठामध्ये विविध अभ्यासक्रमांची सुरूवात झालेली आहे. पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पात एक हजार 704 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. वेरुळ येथील श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात एक हजार व्यक्ती क्षमतेचा सभा मंडप उभारण्यात येणार आहे. या सभामंडपाचे बांधकाम मूळ बांधकामाशी साधर्म्य असणारे असल्याने ते पारंपरिक, टिकाऊ व आकर्षक होईल आणि मंदिराचे मूळ सौंदर्य कायम राहणार आहे. वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारक परिसराचे सुशोभिकरण करुन जतन व संवर्धन करण्याचा निर्णय स्मारक विकास समितीने घेतला आहे. यासाठी जिल्हा वार्षिक समिती मधून 1 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच CSR च्या माध्यमातून देखील 53 लाख रुपये सौंदर्यीकरणासाठी प्राप्त झाले आहेत. पैठण येथे संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नक्कीच पर्यटनास चालना मिळणार आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पावर जल पर्यटन प्रकल्प हाती घेतला जात आहेत, असेही सुभाष देसाई यांनी सांगितले.