कुठे घुमला सगळ्यात पहिल्यांदा ‘जय भीम’चा नारा? निझामानं ऐनवेळी बंदी घातली, कशी पार पडली मक्रणपूरची सभा?

| Updated on: Dec 06, 2021 | 10:14 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, समाजाने इतिहासाचा विसर पडू द्यायचा नसतो. जे लोक इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत... बाबासाहेबांच्या याच शिकवणीची आठवण ठेवत, त्यांच्या चळवळीतील काही ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्याचा हा प्रयत्न...

कुठे घुमला सगळ्यात पहिल्यांदा जय भीमचा नारा? निझामानं ऐनवेळी बंदी घातली, कशी पार पडली मक्रणपूरची सभा?
30 डिसेंबरला मराठवाड्यातील दलित परिषदेचा स्मरणदिन मक्रणपूर येथे जयभीम दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचेच हे व्यासपीठ
Follow us on

औरंगबाादः दलित बांधव परस्परांना भेटल्यावर जयभीम (Jaibhim) म्हणतात. सभा संमेलनात एकजूटीची ताकद दर्शवायची असल्यास जयभीमचाच नारा घुमतो. याच एकजुटीने अन्याय, जुलूमाची सत्ता उलथवून टाकली. पण हा जयभीमचा नारा जिथे सर्वात आधी घुमला, त्याचा इतिहासही मोठा रंजक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात मक्रणपूर (Makranpur) गावात 1938 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची सभा एक ऐतिहासिक सभा झाली. तिथेच त्यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे भाऊसाहेब मोरे (Bhausaheb More)  यांनी सभा संपल्यानंतर जयभीम असा नारा दिला. यापुढे दलित बांधवांनी एकमेकांना भेटल्यावर याच शब्दाने अभिवादन करायचे, असे ठरले. अवघ्या सभेनेही एकमताने याला दुजोरा दिला. त्या दिवशी साऱ्या आसमंतात जयभीमचा जयघोष झाला… आणि पाहता पाहता जयभीम हा शब्द भारतातील जातीयवाद नष्ट करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांची ओळख बनला. दलित ऐक्याचं प्रतीक बनला.

निझामाने सभा घेण्यास ऐनवेळी बंदी घातली…

1938 चा तो काळ. क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दलितांच्या उद्धाराचे कार्य वेगाने सुरु होते. त्यांच्या या कार्यामुळे मराठवाड्यातील भाऊसाहेब मोरे अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी डॉय बाबासाहेबांची आवर्जून भेट घेतली व त्यांना कन्नड येथे दलितांच्या परिषदेसाठी येण्याचे आमंत्रण दिले. डॉ. बाबासाहेबांनी ते निमंत्रण स्वीकारले. त्यांनी दिलेल्या तारखेनुसार 30 डिसेंबर 1938 रोजी कन्नड येथे दलितांची परिषद घ्यायचे ठरले. परंतु त्या काळात निझाम सरकार डॉ. बाबासाहेबांच्या विरुद्ध होते. त्यांनी बाबासाहेबांना मराठवाड्यात सभ घेण्यास मज्जाव केला. त्यांच्या सभेवर बंदी झाली. पण मराठवाड्यातली अत्यंत महत्त्वाची परिषद कोणत्याही स्थितीत पार पाडायचीच, असा निग्रह भाऊसाहेब मोरे, श्यामराव जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी केला. त्यांनी ही दलित परिषद ब्रिटिश आमदनीतील चाळीसगाव तालुक्यातील कन्नडच्या सीमेवर असलेल्या मक्रणपूर (डांगरा) या गावी आयोजित केली. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या उपस्थितीत मक्रणपूर येथे दलित बांधवांची मोठी परिषद संपन्न झाली.

आसमंतात घुमला ‘जयभीम’चा नारा

याच परिषदेत भाऊसाहेब मोरे यांनी या परिषदेत मराठवाड्यातील अस्पृश्यांना भोगाव्या लागणाऱ्या हाल अपेष्ठांची व्यथा ऐकवली. त्या ऐकून धीरोदात्त डॉ. बाबासाहेबांचे मन हेलावले व त्यांनी अस्पृश्यांना हीन दर्जाची कामे करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेबांनी अस्पृश्य बांधवांच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवले. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी लढा देण्याचा संदेश दिला. याच ऐतिहासिक परिषदेत भाऊसाहेब मोरे यांनी सर्व दलित बांधवांना आता यापुढे भेटल्यावर ‘जयभीम’ म्हणावे, असा संगेश दिला. मोरे यांनी व्यासपीठावरून जीयभीम ची घोषणा केली. परिषदेत सर्व उपस्थित बांधवांनी एका स्वरात जयभीम म्हणून प्रतिसाद दिला, जो संपूर्ण आसमंतात घुमला. तेव्हापासूनच दलित बांधव परस्परांच्या भेटीला जयभीम असे म्हणण्यास प्रारंभ झाला. भाऊसाहेब मोरे हेच जयभीम या घोषणेचे जनक मानले जातात.

संत गाडगेबाबांनी केली होती एक दिवस आधी सफाई

मक्रणपूरच्या ऐतिहासिक सभेच्या एक दिवस आधी गाडगेबाबा तेथे येऊन गेल्याचे सांगितले जाते.

महान व्यक्तींचे चरणस्पर्श लाभलेली प्रत्येक गोष्ट स्वतःतच एक इतिहास बनून जाते. मक्रणपूरची 1938 साली ऐनवेळी ठरलेली सभादेखील अशीच ऐतिहासिक ठरली. या सभेनंतर मक्रणपूरचे भाग्य तर उजळलेच. पण त्या आधी म्हणजे 29 डिसेंबर 1938 रोजीही आणखी एका महान व्यक्तीचे इथे चरणस्पर्श झाले. असं म्हणतात की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच संत गाडगेबाबा या गावात येऊन गेले होते. या गावाची स्वच्छताही गाडगेबाबांनी केली होती. संत गाडगेबाब समाजसुधारणेचे जे काम कीर्तनाच्या माध्यमातून करत होते, तेच कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकारणाच्या माध्यमातून करत होते. त्यामुळे गाडगेबाबा हे एकमेव संत होते, ज्यांचा सन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत होते. या दोघांच्या वारंवार भेटी होत. परस्परांचा ते आपल्या कार्यासाठी सल्लाही घेत असत.

मक्रणपूरमध्ये आजही 30 डिसेंबरला धम्म परिषदेचे आयोजन

मराठवाड्यातील भाऊसाहेब मोरे यांचे कुटुंबीय आजही मक्रणपूरमधील त्या व्यासपीठाचे स्मरण ठेवत 30 डिसेंबर रोजी मक्रणपूर गावात धम्म परिषदेचे आयोजन करतात. अजूनही विकासाचे वारे न पोहोचलेल्या दलित बांधवांसाठी काय कार्य केले पाहिजे यावर मान्यवर मत मांडतात. या निमित्ताने अजूनही दरवर्षी दलित चळवळीतील नेत्यांची एकजूट होते आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाते. मात्र कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून मक्रणपूर येथील ही परिषद होऊ शकली नाही.

इतर बातम्या-

Omicron : ओमिक्रॉनचे 8 रुग्ण आढळल्याने राज्याचे धाबे दणाणले, दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांशी बैठक

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले