मनाला चटका लावणारी घटना, आई-वडील ऊस तोडणीसाठी बारामतीला गेले, पण धुळ्यात चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

| Updated on: Feb 18, 2024 | 10:38 PM

धुळ्याच्या लोणखेडी गावात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात गेली. पण इकडे धुळ्यात त्यांच्या दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय.

मनाला चटका लावणारी घटना, आई-वडील ऊस तोडणीसाठी बारामतीला गेले, पण धुळ्यात चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू
Follow us on

धुळे | 18 फेब्रुवारी 2024 : धुळ्याच्या लोणखेडी गावात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आई-वडील ऊस तोडणीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात गेली. पण इकडे धुळ्यात त्यांच्या दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झालाय. अतिशय सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण लोणखेडी गाव सुन्न झालंय. बालकांचे आई-वडील पोटापाण्यासाठी पुणे जिल्ह्यात ऊस तोडणीचं काम करायला गेले. पण इतके लोणखेडी गावात झोपडीला आग लागल्याने त्यांची बालकं होरपळली. संबंधित घटनेनंतर बालकांच्या इतर नातेवाईकांनी घटनास्थळी हंबरला फोडला. बालकांची आई-वडील गावी आली तेव्हा त्यांचा आक्रोश काळजाचा ठोका चुकवणारा होता.

खरंतर ही बालकांचे गाव मूळचे सटाणा तालुक्यातील आहेत. ते लोणखेडी गावात आपल्या आजोळी आले होते. पण त्यांच्या आजोळी ते राहत असलेल्या झोपडीला आग लागली. या आगीत बालकांचा होरपळून मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी बालकांचे आई-वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिल. या प्रकरणाची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

सटाण तालुक्यातील वडील दिंगरी येथील रहिवाशी असलेले नाना पवार यांना चार वर्षांची मुलगी रेणू आणि सात वर्ष वयाचा अमोल हा मुलगा आहे. नाना पवार यांची पत्नी लोणखेडी येथील रहिवाशी आहे. पवार दाम्पत्य हे ऊस तोडीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामतीला गेले आहे. तर अमोल आणि रेणू ही दोन्ही आजींसोबत होती. गावाबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती. त्यांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजुला गेल्या होत्या.

यावेळी झोपडीला आग लागली. वाऱ्यामुळे आगीने जोर धरत झोपडीतील साहित्य आणि पालापाचोळ्याचे छताने पेट घेतला. या घटनेत रेणू आणि अमोल झोपडीत अडकले. तर बाहेरुन बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाला. दुदैवाने या घटनेत दोघा मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. यानंतर मोठया प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवता आले. आगीचे कारण अजून समोर आले नसले तरी चुलीतील विस्तवमूळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.