चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील ‘घोडनकप्पी’ गावासाठी कोलाम बांधवांनी श्रमदानातून रस्ता तयार केलाय. विशेष म्हणजे नागरिक-सामाजिक कार्यकर्त्यांच्या कष्टातून 2 किलोमीटरचा हा रस्ता तयार झालाय, तब्बल 74 वर्षांनी गावाला हक्काचा रस्ता मिळालाय, राज्याच्या सीमेवरील या गावाला प्रशासनाने अडगळीत टाकल्याचीही भावना होती.
चंद्रपूर जिल्ह्यात जिवती या दुर्गम तालुक्यातील अतिदुर्गम घोडनकप्पी गावाला अखेर रस्ता मिळाला. 15 ऑगस्ट निमित्त ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आणि तिरंगा फडकावून कामाला सुरुवात झाली. गावाला जोडणारा दोन किलोमीटरचा रस्ता आज कोलाम आदिवासी बांधवांनी श्रमदानातून पूर्ण केला. गावाला 74 वर्षांनी मिळालेला रस्ता त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उमगणारा ठरलाय.
महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर जिवती तालुक्यात कोलाम, गोंड ही आदिवासी जमात बहुसंख्याक आहे. मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित हा घटक आजही उपेक्षित जीवन जगत आहे. शासन गेल्या 75 वर्षांत या आदिवासींना मुख्य रस्त्याशी देखील जोडू शकले नाही. त्यामुळे त्यांची मुख्य प्रवाहाशी नाळ जुळू शकली नाही. भौगोलिकदृष्ट्या डोंगर रांगांचा भाग असलेलं हे क्षेत्र दुर्लक्षित- मागास आहे. ‘भारी’ या गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या घोडनकप्पी इथं कोलामांची 21 कुटुंबे आहेत. अजूनपर्यंत या गावात कोणत्याही शासकीय योजना पोहचल्या नाही.
घरकुल, शौचालय, रस्ता, दळणवळण, रोजगार अशा कुठल्याही सुविधा त्यांनी बघितलेल्या नाहीत. स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यदिन म्हणजे काय, हे ज्यांना ठाऊक नाही, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या गप्पा किती वरवरच्या आहेत, हे ठळक करणारी ही स्थिती आहे. कोलाम विकास फाऊंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेनं हे विदारक चित्र बघितलं आणि कोलामांची दशा बदलण्याचा निर्णय घेतला. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे गावात स्वातंत्र्याचा ध्वज फडकावणं.
या गावात तिरंगा फडकला. स्वातंत्र्यदिनी अशाप्रकारे ध्वजारोहण होतं, हे कोलाम विकास फाऊंडेशननं या गावाला दाखवलं. पण एवढ्यावरच भागणारं नव्हतं. या गावाला मुख्य रस्त्याशी जोडणारा बारमाही रस्ता नाही. त्यामुळं असंख्य अडचणींना गावकरी सामोरे जात होते. पावसाळ्यात तर विदारक स्थिती असायची. लोकांच्या श्रमदानातून रस्तेनिर्मिती साकार करण्यासाठी स्थानिकांच्या बैठका घेतल्या. या निर्धन, निरक्षर कोलामांनी रस्त्याच्या प्रश्नावर एकजूट दाखवली आणि घोडनकप्पी आणि आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं चक्क रस्ता तयार केला. हा रस्ता शासन-प्रशासन-लोकप्रतिनिधींना सणसणीत चपराक ठरलाय.
निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि चारीबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं घोडनकप्पी खऱ्या अर्थानं आज स्वतंत्र झालंय. कोलाम विकास फाऊंडेशननं दाखवलेल्या तळमळीने हा कायापालट होऊ शकला. याच संस्थेनं कोरोना काळात या डोंगर कुशीतील दुर्गम गावांना अन्नधान्याची नियमित मदत केली. हेतू प्रामाणिक असेल तर मदतीचे हात आपोआप पुढे येतात, हे आजही दिसून आलं. औद्योगिकदृष्ट्या प्रगत चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातील गावांची संपर्कहीन स्थिती या निमित्ताने पुढे आली. आदिवासी किंवा मागासांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस कृतीसह आणखी बरंच काही करण्याची गरज या रस्ते श्रमदानाने करून दिली.
संबंधित बातम्या
प्रवाशांचा रविवार खड्ड्यात! कल्याण-शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतू कोंडी; प्रवाशी वैतागले!
आता उणे तिथे ठाणे असे म्हणावे लागेल… एकनाथ शिंदेंकडून पालिका कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक
Eventually Ghodancappi village got a road in chandrapur, the villagers worked hard