जालना : अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने विहिरीवर पाळणा बांधून आमरण उपोषण सुरु केले आहे. हसनाबादेतील गिरीजा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी वाळूमाफियांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने उपोषणास्त्र उचललं आहे. हे उपोषण सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव-खडक नदीपात्रात हे उपोषण सुरु आहे.
विहिरीत पाळणा बांधून त्यावर बसून हे उपोषण सुरु केलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नानासाहेब वानखेडे यांनी विविध मागण्यासाठी बोरगाव खडक येथील नदीपात्रातील पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीच्या नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केलं आहे.
दररोज जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने हसनाबाद परिसरात गिरिजा-पूर्णा नदीपात्रातून वाळूमाफियांकडून दिवसरात्र बेसुमार अवैध वाळू उपसा सुरु आहे. शेकडो टिप्पर वाळू वाहतूक करीत आहेत. यामुळे नदीपात्रच नाहीसे होण्याच्या मार्गावर असून यावर्षी भीषण पाणीटंचाईही निर्माण झाली आहे. यामुळे संबंधित वाळूतस्करांना पाठीशी घालून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, नदी थडीवरील वाळू विकणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नानासाहेब वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरु आहे.
दरम्यान, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरुच राहणार असल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.