वार, तारीख, वेळ, पहिले प्रवासी सगळं ठरलं! सिंधुदुर्गाच्या पहिल्या विमान उड्डाणाची प्रतिक्षा, बुकिंग आहे का?

| Updated on: Oct 01, 2021 | 9:50 AM

चिपी विमानतळाचा राजकारणाचा भाग थोडासा बाजूला सारला तर कोकणवासियांसाठी स्वत:च्या घरी जाण्यासाठी तेही कमी वेळेत एक चांगली सुविधा तयार होतेय. त्यामुळेच तुमचं राजकारण चालू द्या, आम्ही तिकिट बुक करुन घरी जातो असाच कोकणवासिय म्हणतोय.

वार, तारीख, वेळ, पहिले प्रवासी सगळं ठरलं! सिंधुदुर्गाच्या पहिल्या विमान उड्डाणाची प्रतिक्षा, बुकिंग आहे का?
275 हेक्टरवर भव्यदिव्य विमानतळ, एअरबस, बोईंग उतरण्याचीही क्षमता
Follow us on

मुंबई : सिंधुदुर्गाच्या पहिल्या विमान उड्डाणाची प्रतिक्षा आता संपत येतेय. कारण आज महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आता प्रतिक्षा आहे ती 9 ऑक्टोबरची. कारण याच दिवशी चिपी विमानतळाचं उदघाटन होणार आहे. तेही दुपारी 1 वाजता. त्याधीच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातलं राजकारण तापलेलं आहे. पण राजकारणाचा भाग थोडासा बाजूला सारला तर कोकणवासियांसाठी स्वत:च्या घरी जाण्यासाठी तेही कमी वेळेत एक चांगली सुविधा तयार होतेय. त्यामुळेच तुमचं राजकारण चालू द्या, आम्ही तिकिट बुक करुन घरी जातो असाच कोकणवासिय म्हणतोय. त्याचा पुरावा म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंतची बुकींग फुल्ल आहे.

विशेष म्हणजे चिपी विमानतळावर पहिलं लँडींगही दुपारी 1 वाजता होईल. हे विमान खास असेल. कारण हे विमान मान्यवरांसाठी असणार आहे. याच विमानातून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर मान्यवर प्रवास करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलीय. त्यामुळेच कोकणासाठी 9 नोव्हेंबरची तारीख ही ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. कारण याच दिवशी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधकही एकाच व्यासपीठावर येतील.

मान अपमानाचं सत्र

चिपी विमानतळाच्या श्रेयावरुन शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. राणेंनी तर दिल्लीत प्रेस कॉन्फरन्स घेऊन परस्पर उदघाटनाचा कार्यक्रमही जाहीर करुन टाकला. त्यानंतर राज्य सरकारनं रितसर कार्यक्रम ठरवून त्याची निमंत्रण पत्रिका तयार केली. त्या पत्रिकेवर प्रोटोकॉलनुसार ज्यांची नावं अपेक्षीत आहेत, त्या सर्वांची ठेवण्यात आल्याचं दिसतंय. पण निमंत्रण पत्रिकेत तिसऱ्या क्रमांकावर नाव असल्यामुळे राणे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावर विनायक राऊतांनी टोमना मारलाय. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. जे तीन नंबरच्या स्थानावरुन ऊहापोह करतायत ते त्यांचं अज्ञान आहे असही राऊत म्हणालेत. एवढच नाही तर त्यासाठी चांगला गुरु करावा, चांगलं मार्गदर्शन घ्यावं असं सांगायलाही शिवसेना खासदार विसरले नाहीत.

प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम

राणेंच्या नाराजीच्या बातमीवर विनायक राऊतांनी प्रोटोकॉलवर बोट ठेवलंय. कुणाला बघून कार्यक्रम करायचा नाही. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणं ज्यांना ज्यांना बोलवणं आवश्यक आहे, त्या सर्वांना सन्मानाने बोलवण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होतंय. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही प्रॉटोकॉलनुसार कार्यक्रम होणार असही राऊत म्हणाले. टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळ्यावेळी सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रमुख होते. त्यामुळे प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे, कुठे कुठे आहे ते, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील त्याचे ते अज्ञान आहे, त्यांना नेमकं कळलं नाही शासनाचा प्रोटोकॉल काय आहे ते, त्यांना चांगला गुरू करावा चांगले मागदर्शन घ्यावं असा खोचक टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना लगावलाय.

(Maharashtra Chipi Sindgudurg Airport First Flight on 9 Octomber Booking full until November 15th)

हे ही वाचा :

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राणे रुसल्याची चर्चा, शिवसेना म्हणते, ‘अज्ञानी माणसाने चांगला गुरु ठेवावा’