मुंबईः राज्यातील कायदा व राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम असून कोणतीही जातीय तेढ निर्माण झाल्यास आम्ही त्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. राज्यात रमजान ईद (Ramadan Eid) आणि अक्षय्य तृतीयेच्या (Akshay Tritiya) पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. राज्यातील लोकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
समाजात कोणीही जातीय तेढ निर्माण केली तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. आम्ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. नोटीसा दिल्या आहेत. 87 एसआरपीएफ कंपनी 30 हजारावर होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच 13 हजार जणांना 149 ची नोटीस दिली असून 15 हजार लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे. कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल.त्यामुळे जनतेला आवाहान करतो, शांतता व सुव्यवस्था राखून पोलिसांना सहकार्य करावं. ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना पोलीस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा असा प्लॅन सांगितला.
दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, याबाबत विचारले असता त्यांच्यावरील कारवाईचं काम औरंगाबाद पोलीस आयुक्त करतील . राज ठाकरे यांच्या भाषणाचा अभ्यास करून ही कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.