मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना रोखण्यात आलं. आधी त्यांना नजरकैदेत ठेवलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. 4 ऑक्टोबर 1977ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेज जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
देशात सध्या पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देश पेटलेला पाहायला मिळत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावं लागलं. त्यांनाही जाऊ दिलं नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरताना दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी अकोला बँक निवडणुकीवर बोलण्यास नकार दिला. बच्चू कडू हे अपक्ष आमदार असून ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. आम्ही जास्त त्यावर बोलणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहे. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे, असा दावा त्यांनी केला.
उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 October 2021https://t.co/NusrP8DDaC#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
संबंधित बातम्या:
Priyanka Gandhi : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी उ. प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी
(congress plans ‘jail bharo’ against priyanka gandhi arrest)