Video: हाच खरा सामाजिक सलोखा! अजानचा भोंगा सुरु होताच आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीचा डिजे थांबला

| Updated on: Apr 14, 2022 | 10:18 PM

Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2022: हा सगळा प्रकार नेमका चेंबूरमध्ये कुठे घडला, असाही प्रश्न आता विचारला जातो आहे. चेंबूरच्या महात्मा फुले नगर नंबर 1 मधून मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक पी.एल. लोखंडे मार्ग इथं निघालेली.

Video: हाच खरा सामाजिक सलोखा! अजानचा भोंगा सुरु होताच आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीचा डिजे थांबला
चेंबूरमधील व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसलं? पाहा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) महाराष्ट्रासह देशभरात साजरी झाली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. मिरवणुका निघाल्या. थाटामाटात जयंतीचा उत्सव पार पडला. या सगळ्या उत्सवात एक सामाजिक सलोखा जपणारी गोष्ट अधोरेखित झाली. या गोष्टीचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल (Social Media Viral) झाला आहे. घटना आहे, चेंबूरमधली (Chembur). ही घटना पाहिल्यानंतर सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न नेमका कसा, केला जातो, हे अधोरेखित झालंय. आंबेडकर जयंतीची मिरवणूक निघाली होती. मिरवणुकीत डीजे वाजवला जात होता. अशातच, अचानक अजान सुरु झाल्याचा आवाज ऐकू आला. हे कळताच मिरवणुकीतील लोक काहींनी पुढाकार घेतला. मिरवणुकीतील डीजे थांबवला. अजान सुरु असेपर्यंत डीजेचा आवाज पूर्ण पणे थांबवण्यात आला. आणि सामाजिक सलोख्याचा तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वधर्मसमधाव या विचारांचा वारसा जपण्याचं आवाहनही करण्यात आलं.

नेमकं चेंबूरमध्ये कुठं?

हा सगळा प्रकार नेमका चेंबूरमध्ये कुठे घडला, असाही प्रश्न आता विचारला जातो आहे. चेंबूरच्या महात्मा फुले नगर नंबर 1 मधून मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक पी.एल. लोखंडे मार्ग इथं निघालेली. दरम्यान, मध्येच अजान सुरु झाली.

वाटेत असलेल्या एका मशिदीमध्ये काही मुस्लिम बांधव आपली नियमित प्रार्थना करत होते. यावेळी अजान सुरु झाल्यामुळे मिरवणुकीच्या आयोजकांनी डीजे बंद केला. तसंच सामाजिक सलोखा जपण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियात व्हायरल झाली असून अनेकांनी या मिरवणुकीत करण्यात आलेल्या कृतीचं कौतुक केलंय.

पाहा व्हिडीओ :


…म्हणून घटनेला महत्त्व!

गुढीपाडव्याला झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि या भोंग्यावरुन दिली जाणारी अजानची प्रार्थना यावर आक्षेप नोंदवला होता. मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. तसंच मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालीसेनं उत्तर देऊ, असा इशाराही दिला होता. आता 3 मेपर्यंत राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. सरकारलाही याबाबत पावलं उचलण्यास सांगितलं आहे. अन्यथा मशिदींच्या भोंग्यांना मनसे स्टाईल हनुमान चालीसेनं उत्तर देऊ, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं.

राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेवरुन राजकारण तापलेलं होतं. अनेक राजकीय प्रतिक्रियाही यावरुन उमटल्या होत्या. दरम्यान, या सगळ्यात घडामोडींच सामाजिक सलोख जपणारी ही घटना सगळ्यांचच लक्ष वेधून घेते आहे.