नवी मुंबई : ऑडिट करुनही पूल कोसळण्याच्या घटना मुंबईत सुरुच आहेत. नवी मुंबईतील वाशीमध्ये ऑडिट केलेला पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. यामध्ये दोन तरुणांना जबर मार लागलाय. एकाच्या डोक्याला, तर दुसऱ्याच्या छातीला दुखापत झाली आहे. या दोघांवरही सध्या उपचार सुरु असून पोलिसांनी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु केलाय.
मुंबईतील सीएसएमटी येथे पादचारी पुलाचा भाग कोसळून सात निष्पाप लोकांचा जीव गेला होता. यातूनही कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. वाशीतील दुर्घटनाग्रस्त पूल सिडकोने 20 वर्षांपूर्वी बांधला होता. मिनी शिशोर आणि सागर विहार यांना जोडणारा हा पूल आहे. पण या पुलाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडल्याचं बोललं जातंय.
नवी मुंबई महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्या मते, पुलाच्या दुरुस्तीची वर्कऑर्डर काढली होती. पण वर्कऑर्डर काढूनही पुलावरुन रहदारी का सुरु होती असाही प्रश्न उपस्थित होतो. सीएसटीएमजवळ एवढी मोठी दुर्घटना घडूनही नवी मुंबई महापालिकेने त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचं यातून समोर आलंय.
दरम्यान, या सर्व प्रकाराला महापालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनार्जित चव्हाण यांनी केलाय. दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशीही मागणी त्यांनी केली.